गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने पुन्हा एकदा काबूलवर ताबा मिळवला आणि अशरफ घनी यांच्या सरकारला सत्तेतून खाली खेचलं. जगभरातल्या देशांनी तालिबानची निर्भत्सना केली परंतु त्यावेळी पाकिस्तानने उघडपणे तालिबानला समर्थन दिले होते. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी तर अफगाणी नागरिकांनी गुलामीच्या बेड्या तोडल्या असल्याचे उद्गार काढले होते.

पण आता पाकिस्तान तालिबानचे संबंध बिघडतायत –

पाकिस्तानने तालिबानची कायम मदत केली असल्याचा इतिहास आहे. भारत जेव्हा तालिबानविरोधी गटात होता, तेव्हा पाकिस्तान व तालिबान जवळ आले. अमेरिकेने मात्र ९/११ नंतर अफगाणिस्तानवर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला अमेरिकेचे समर्थन करणे भाग पडले होते. तर आता तालिबानच्या हातातच सत्ता आहे पण स्थिती अशी आहे की, तालिबान व पाकिस्तानचे संबंध बिघडत चालले आहेत.

तालिबानची पाकिस्तानला धमकी –

अफगाणिस्तानातील कुनार व खोस्त या दोन प्रांतांमध्ये पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी केलेल्या हल्ल्यामध्ये २० मुलांसह ५० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यानंतर तालिबानने पाकिस्तानला थेट युद्धाचेच आव्हान दिले आहे. या घटनेच्या आधीही तालिबानी व पाकिस्तानी सैनिकांमध्ये सीमेवर चकमकी झडतच होत्या. यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले असून पाकिस्ताच्या आक्रमक वृत्तीला आम्ही सहन करणार नाही असे तालिबानने स्पष्ट केले आहे.

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानविरोध प्रचंड प्रमाणात वाढतोय –

जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला तेव्हा इस्लामाबादला वाटले की आता, तालिबान पाकिस्तानातील तहरीक-ए-तालिबानला (TTP) काबूत ठेवेल. परंतु झाले उलटच. तालिबानने टीटीपीला पाठिंबाच दिला ज्यामुळे तहरीक-ए-तालिबानने पाकिस्तानातील कारवायांमध्ये वाढच केली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार जानेवारी २०२२ पासून आत्तापर्यंत झालेल्या चकमकींमध्ये टीटीपीचे १२८ दहशतवादी तर पाकिस्तानचे १०० सैनिक ठार झाले आहेत.
ड्युरांड रेषेवरूनही पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये वाद-विवाद आहेत. विशेषत: तालिबान सत्तेत आल्यानंतर तर या विवादांमध्ये वाढ झाली आहे. सीमेवर पाकिस्तान करत असलेल्या कोंडींवर तालिबानने अनेकवेळा नाराजी व्यक्त केली असून दोन्ही पक्षांमध्ये चकमकीही झडल्या आहेत. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानविरोध प्रचंड प्रमाणात वाढतोय कारण, त्या देशातील अनेकांना वाटतंय की अफगाणिस्तान अस्थिर राहण्यासाठीच पाकिस्तान प्रयत्नशील असून परिणामी अफगाणिस्तानात पाकिस्तानविरोधी अनेक आंदोलनेही झाली आहेत.

अमेरिकेच्या माघारीचा परिणाम –

अब्जावधी डॉलर्स खर्च करून व हजारो सैनिकांचे प्राण गमावल्यानंतर अमेरिकेने काबूलमधून काढता पाय घेतला. पाकिस्तानातील टीटीपी या सगळ्याकडे वेगळ्या नजरेने बघत आहे. अमेरिका माघारी गेल्यानंतर टीटीपीला हुरूप आला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांध्येच पाकिस्तानात दहशतवाद्यांनी ५२ हल्ले केले असून १५० पेक्षा जास्त लोकांनी प्राण गमावले आहेत.

राजनैतिक अस्थिरता –

इम्रान खान यांचे तालिबानशी विशेष सलोख्याचे संबंध होते. इम्रान खान अमेरिकाविरोधी भूमिका मांडायचे तर नवीन पंतप्रधान शाहबाज शरीफ अमेरिकेशी संबंध सुधारण्याची भूमिका मांडत आहेत. इम्रान खान यांच्या सरकारने टीटीपीबरोबर युद्धविरामही केला होता, जो यशस्वी झाला नाही तो भाग वेगळा. तर शाहबाज शरीफ यांनी दहशतवादाच्या विरोधात लढा सुरू ठेवण्याचे सूतोवाच केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तालिबानची राजवट असलेला अफगाणिस्तान व पाकिस्तानचे संबंध कसे राहतात हे बघणे महत्त्वाचे आहे, कारण त्याचा थेट भारतावर परिणाम होणार आहे.