काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात घेतलेल्या अनेक निर्णयांनी हा वाद आणखी चिघळत असल्याचे दिसून येत आहे. भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पाऊल उचलले आहे. भारताने जल, आर्थिक, हवाई क्षेत्र, व्यापार, लष्करी अशा सर्वच टप्प्यांवर पाकिस्तानची कोंडी केली आहे. पाकिस्तानकडून क्षेपणास्त्राची चाचणी, वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन भारताविरुद्ध मदत मागणे आदी बाबींवरून हे स्पष्ट झाले आहे की, पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव वाढत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला कसे, केव्हा व कुठे प्रत्युत्तर द्यायचे हे ठरविण्यासाठी पूर्ण ‘ऑपरेशनल स्वातंत्र्य’ देऊन भारत कठोर भूमिका घेत असल्याचे संकेत दिले आहेत. परंतु, आता ताजिकिस्तानच्या पर्वतरांगांमधील एक दुर्गम हवाई तळ पाकिस्तानच्या चिंतेचे कारण ठरत आहे. भारताने या हवाई तळात काही सुधारणा केल्या असल्याची माहिती आहे. परंतु, भारताचा हवाई तळ ताजिकिस्तानमध्ये कसा? या हवाई तळाने पाकिस्तानची चिंता का वाढवली? त्याविषयी जाणून घेऊ…

ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेपासून केवळ १५ किलोमीटर पश्चिमेला असणारा आयनी एअरबेस हा भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या सर्वांत महत्त्वाच्या हवाई तळांपैकी एक आहे. (छायाचित्र-पीटीआय)

आयनी हवाई तळाचे धोरणात्मक महत्त्व

ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेपासून केवळ १५ किलोमीटर पश्चिमेला असणारा आयनी एअरबेस हा भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या सर्वांत महत्त्वाच्या हवाई तळांपैकी एक आहे. हा भारताचा एकुलता एक बाह्य देशीय सैनिकी (हवाई दलाचा) तळ आहे. १९९० च्या दशकात ताजिकिस्तानच्या यादवी युद्धानंतर निष्क्रिय झालेल्या या तळाचा विकास भारताने केला. त्यासाठी २००२ मध्ये भारताने ७० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक तेथे केली आणि हा तळ विकसित केला. हा तळ विकसित करताना २०१० पर्यंत भारताने तळावरील धावपट्टी ३,२०० मीटरपर्यंत वाढवली, तेथे आश्रयस्थाने बांधली, इंधन आगारे तयार केली, हवाई वाहतूक नियंत्रण पायाभूत सुविधा बांधल्या आणि इल्युशिन-७६ सारख्या जड-लिफ्ट विमाने व सुखोई एसयू-३० एमकेआयसारख्या बहु-भूमिका असलेल्या लढाऊ विमानांसाठी हा तळ अधिक सक्षम केला.

ताजिकिस्तान सरकारचा असा दावा आहे की, कोणतेही परदेशी सैन्य त्यांच्या भूमीवरून काम करीत नाही. मात्र, उपग्रह प्रतिमा, प्रादेशिक अहवाल व लष्करी विश्लेषक असे सूचित करतात की, भारतीय हवाई दलाचे कर्मचारी, अभियंते, तंत्रज्ञ व सुरक्षा कर्मचारी अनेक वर्षांपासून आयनी हवाई दलावर कार्यरत आहेत. केंद्राने अधिकृतपणे आयनी हवाई तळाला ऑपरेशनल बेस म्हणून लेबल लावलेले नाही किंवा अशी काही घोषणाही केलेली नाही; मात्र त्याची क्षमता स्पष्ट आहे. पाकिस्तानच्या पश्चिम सीमेपासून, बलुचिस्तान व खैबर पख्तुनख्वा या प्रांताच्या जवळ स्थित असलेला हा तळ भारताला या प्रदेशात आपली शक्ती प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम करतो.

पाकिस्तानच्या चिंतेचे कारण काय?

भारत-पाकिस्तानमध्ये संघर्ष झाल्यास भारत केवळ पूर्वेकडून काश्मीरमधूनच नाही, तर वायव्येकडूनदेखील पाकिस्तावर लष्करी दबाव आणू शकतो. त्यामुळे पाकिस्तानला संपूर्ण संरक्षण स्थिती पुन्हा तयार करण्यास भाग पाडले जाईल. तज्ज्ञांचा असा युक्तिवाद आहे की, मध्य आशियात भारताची केवळ उपस्थितीच पाकिस्तानसाठी चिंतेची बाब आहे. या क्षेत्रातील भारताच्या उपस्थितीने पाकिस्तानला मर्यादित हवाई संरक्षण आणि देखरेखीच्या साधनांचा विस्तार करण्यास भाग पाडले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण वर्तुळात अशी चिंता वाढत आहे की, भारत आयनी तळाचा वापर गुप्तचर मोहिमा, ड्रोन हल्ले किंवा हवाई ऑपरेशन्ससाठी प्रक्षेपण बिंदू म्हणून करू शकतो.

परंतु, आयनीचा विस्तार पाकिस्तानच्या पलीकडे आहे. ताजिकिस्तानची सीमा चीनच्या संवेदनशील शिनजियांग प्रांताशी जुळलेली आहे. २०२० मध्ये चिनी सैन्याशी झालेल्या गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर भारताला पश्चिमेकडील चिनी लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता वाढली आहे. त्यासाठी या तळाचा वापर होत असल्याची माहिती आहे. आयनी तळ दीर्घ संघर्षातही भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

त्याव्यतिरिक्त चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) तयार होत असताना या प्रदेशाजवळील भारताची उपस्थिती महत्त्वाची ठरते. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) हा एक मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्प चीन आणि पाकिस्तान यांच्यात व्यापार आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी असून प्रकल्पांतर्गत पाकिस्तानमध्ये रस्ते, रेल्वे, ऊर्जा प्रकल्प व बंदरे बांधली जात आहेत.

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतरचे चित्र

अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सत्तेत परतल्याने इस्लामिक स्टेट-खोरासान (IS-K) आणि अल-कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या पुनरुत्थानाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर भारताने तिथे अडकलेले नागरिक आणि राजनैतिक कर्मचाऱ्यांना देशात परत आणण्यासाठी आयनी हवाई तळाचा वापर केला. त्यामुळे हा तळ चर्चेत आला होता आणि हा तळ अतिशय चांगल्या स्थितीत असल्याचेही चित्रांमधून दिसून आले होते.

आयनी हवाई तळाबरोबरच भारताने अफगाण सीमेजवळील फारखोर हवाई तळादेखील वापर केल्याचे वृत्त आहे आणि या तळांवर सुखोई एसयू-३०एमकेआय लढाऊ विमाने तैनात केली आहेत. आयनीमध्ये भारताचा सहभाग बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हद्वारे वाढत्या प्रभावाला बळकटी देतो. ताजिकिस्तानमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करून, भारताने आपल्या दहशतवादविरोधी क्षमता वाढवण्यासह मध्य आशियाई राजकारणात आपला वाटा असल्याचेदेखील सुनिश्चित केले आहे.

पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून हा हवाई तळ चिंतेचा विषय आहे. काश्मीरमध्ये आधीच दबावाखाली असलेल्या पाकिस्तानवर उत्तरेकडून लष्करी दबाव वाढल्यास त्यांचे धोरणात्मक संतुलन बिघडू शकते. या तळावरून पाकिस्तानच्या आण्विक केंद्रांजवळील हालचालींवर लक्ष ठेवता येऊ शकते. कारण- पाकिस्तानची ही बरीच केंद्रे पश्चिम प्रांतांमध्ये आहेत. तसेच, पाकिस्तानात बलुच फुटीरतावादी कारवाया वाढत असताना आणि तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचे (टीटीपी) हल्ले वाढत असताना, ताजिक सीमेवरील भारताची उपस्थिती पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय आहे.