-ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात ६ बाद २०८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारूनही भारतीय गोलंदाज तिचा बचाव करू शकले नाहीत. नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतही भारतीय गोलंदाजांचे हे अपयश प्रकर्षाने दिसून आले. भुवनेश्वर कुमारचा अनुभव कुचकामी ठरतो आहे, गोलंदाजांची निवड चुकते आहे, फिरकीचा पर्याय शोधण्यातही अपयश येत आहे. सातत्याने अयशस्वी ठरणाऱ्या उत्तरार्धातील गोलंदाजीचा (डेथ ओव्हर्स) घेतलेला आढावा.

गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी हेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाचे कारण ठरते का?

नाणेफेकीचा कौल एका मर्यादेपलीकडे सामन्याच्या निकालावर परिणाम करत नाही. मोक्याच्या वेळी तुमची फलंदाजी आणि गोलंदाजी कशी होते, हे सर्वांत महत्त्वाचे असते. भारताच्या फलंदाजांनी आपले कार्य चोख बजावले, पण गोलंदाजांनी त्यावर पाणी फिरवले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चुरशीच्या टी-२० सामन्यात १९वे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. या षटकात तब्बल १६ धावा निघाल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात विजयासाठी औपचारिक दोन धावा करणे ऑस्ट्रेलियाला कठीण गेले नाही. आशिया चषक स्पर्धेपासून हेच घडते आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानेही पुढील सामन्यापूर्वी गोलंदाजीकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले. विश्वचषक स्पर्धा तोंडावर असताना गोलंदाजांच्या रचनेवर विचार व्हायलाच हवा. अन्यथा भारतापुढील आव्हाने कठीण होतील, यात शंका नाही. 

अखेरच्या षटकांत अर्शदीप यशस्वी ठरत असतानाही त्याला संघात स्थान दिले जात नाही.

भुवनेश्वर कुमार अनुभवाचा फायदा उठवण्यात अपयशी ठरतो आहे?

टी-२० क्रिकेट सामना हा उत्तरार्धातील षटकांत निर्णायक ठरतो. त्यातही १९वे षटक हे महत्त्वाचे असते. त्या षटकात चांगली गोलंदाजी झाली, तर अखेरचे षटक टाकणाऱ्या गोलंदाजांवरील दडपण कमी होते. आशिया चषकापासून भुवनेश्वर कुमार याच आघाडीवर सातत्याने अपयशी ठरतो आहे. आशिया चषक स्पर्धेत अखेरच्या दोन सामन्यांत १९वे षटक भुवनेश्वरनेच टाकले. या दोन्ही षटकांत अनुक्रमे १६ आणि १४ धावा निघाल्या. हाच कित्ता ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने गिरवला. तीन सामन्यांत १८ चेंडूंत त्याने ४९ धावा दिल्या. त्याची लय बिघडली आहे. भुवनेश्वर लौकिकाला न्याय देऊ शकत नसल्याचा फटका गेल्या तीन सामन्यांत भारताला बसला आहे. त्यामुळेच विख्यात क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावस्कर यांनीही भुवनेश्वरबाबत चिंता व्यक्त करीत भारताला सावधतेचा इशारा दिला आहे.

बुमराच्या तंदुरुस्तीबाबत अजूनही साशंकता…

दुखापतीमुळे जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल आशिया चषक स्पर्धेत खेळू शकले नाहीत. विंडीज दौऱ्यातही ते नव्हते. आता ते तंदुरुस्त झाले म्हणून त्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले. ही मालिका नक्कीच विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम मानली जाते. मग बुमराला संघात स्थान मिळून तो अंतिम ११ मध्ये कसा नाही? तो १०० टक्के तंदुरुस्त आहे, की नाही? टी-२० विश्वचषक स्पर्धा तोंडावर असल्यामुळे असे प्रश्न उपस्थित राहतात. तंदुरुस्तीनंतर पुनरागमन करताना हर्षलच्या गोलंदाजीत आत्मविश्वासाचा अभाव, तसेच त्याची अचूकता हरवलेली दिसून आली. खेळाडू तंदुरुस्त नसतील, तर त्यांची निवड कशी होते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. संघ निवड प्रक्रियेत काही तरी चुकते आहे आणि विश्वचषकापूर्वी यावर मात करण्याची आवश्यकता आहे.

मोहम्मद शमीला का डावलले जात आहे?

जसप्रित बुमरा, शमी, भुवनेश्वर, उमेश यादव, हर्षल, मोहम्मद सिराज, दीपक चहर, अर्शदीप सिंग, अर्शद खान असे वेगवान गोलंदाजीचे पर्याय भारताकडे असताना, यातून योग्य निवड होताना दिसून येत नाही. टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात अनुभवी शमीला डावलण्यात आले. तो राखीव आहे. उसळणाऱ्या खेळपट्ट्यांवर शमीची भेदकता उपयुक्त ठरली असती. पण भारतीय संघ व्यवस्थापनाकडून युवा गोलंदाजांवरच अधिक प्रयोग होताना दिसत आहेत.

फिरकी गोलंदाज निवडण्यात येणारे अपयश…

आतापर्यंत रविचंद्रन अश्विन हा भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज होता. यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा हे पर्याय उपलब्ध झाल्यावर अश्विन काहीसा मागे पडला. पण अजूनही अश्विन टी-२० क्रिकेटमध्ये किफायतशीर ठरत असताना सातत्याने मनगटी फिरकी गोलंदाज म्हणून चहलला पसंती मिळत आहे. अश्विनचा अनुभव निश्चित फायद्याचा ठरेल. तसेच तो उपयुक्त फलंदाजही आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why indian bowling line up fail to defend big scores print exp scsg
First published on: 22-09-2022 at 07:18 IST