केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ७ नोव्हेंबर रोजी भारतातील विविध शहरांतील प्रदूषणाबाबतची आकडेवारी जारी केली. या आकडेवारीनुसार, बिहारमधील कटिहार हे शहर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं आहे. भारतातील सर्वाधिक प्रदूषित १६४ शहरांच्या यादीत कटिहार हे शहर अव्वल क्रमांकावर असून येथील एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात एक्यूआय हा ३६० इतका नोंदला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कटिहारनंतर दिल्लीचा एक्यूआय ३५४ असून नोएडाचा एक्यूआय ३२८ आणि गाझियाबादचा एक्यूआय ३०४ नोंदला गेला आहे. तर बेगुसराय (बिहार), वल्लभगढ, फरिदाबाद, कैथल, हरियाणातील गुरुग्राम आणि मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर या शहरांमध्ये वायू प्रदूषण सर्वाधिक आहे.

कटिहार शहर प्रदूषित का आहे?

कटिहार हे पूर्व बिहारमधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर झारखंड, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या सीमेवर वसलं आहे. या शहरापासून नेपाळची सीमाही अवघ्या ८० ते १०० किलोमीटर अंतरावर आहे. या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असून या शहाराला गंगा, कोसी, महानंदा, कमला, कारी कोसी यासारख्या लहान-मोठ्या नद्यांनी वेढलं आहे.

कटिहारच्या उत्तरेकडे हिमालय, दक्षिणेकडे झारखंडचा पठार, आजुबाजुला बऱ्याच नद्या आणि मुबलक पाऊस पडत असल्याने या शहरात वर्षभर कमी-अधिक प्रमाणात अल्हाददायक हवामान असतं.

बिहारमधील इतर प्रदूषित शहरे

कटिहार हे बिहारमधील एकमेव प्रदूषित शहर नाही. देशातील पहिल्या १५ सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये बेगुसराय (एक्यूआय-३५५), मोतिहारी (एक्यूआय-३२४), आणि सिवान (एक्यूआय-३१८) अशा तीन अतिरिक्त शहरांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे २०१८ पर्यंत बिहारमधील पाटणा, मुझफ्फरपूर आणि गया या तीन शहरांत ‘एअर-मॉनिटरिंग सिस्टम’ बसवण्यात आली होती. पण या सिस्टमद्वारे सभोवतालच्या हवेची गुणवत्ता आणि राष्ट्रीय स्तरावरील हवेची गुणवत्ता यामध्ये बरीच तफावत होती. यानंतर २०१९ ते जून २०२२ या कालावधीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बिहारमधील २२ जिल्ह्यांमध्ये एकूण ३५ ‘एअर-मॉनिटरिंग सिस्टम’ स्थापित केले. पण अद्याप १६ जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारची कोणतीही यंत्रणा बसवण्यात आली नाही.

हेही वाचा- विश्लेषण: ट्विटरवर बनावट खात्यांचा सुळसुळाट, एलॉन मस्कही त्रस्त; कसे ओळखायचे फेक अकाऊंट्स?

बिहारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक घोष यांनी ‘सीएनएन-न्यूज१८’ ला सांगितलं की, यापूर्वी बिहारमध्ये केवळ पाटणा, मुझफ्फरपूर आणि गया येथे प्रदूषण पातळीचं परीक्षण करणारी यंत्रणा बसवण्यात आली होती. पण २०१८ मध्ये मी पीसीबीच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर, बिहारच्या २२ जिल्ह्यांमध्ये एकूण ३५ ‘एअर मॉनिटरिंग सिस्टम’ बसवले.”

‘एअर क्वालिटी इंडेक्स’ किंवा AQI म्हणजे काय?

हवेची गुणवत्ता दर्शवण्यासाठी एक्यूआयच्या आकड्यांचा वापर केला जातो. एक्यूआयचा आकडा जितका अधिक असेल, तितकी हवा जास्त खराब असते. हवेचा दर्जा मोजण्यासाठी ‘कॉन्स्ट्रेशन पीएम २.५’ या मापन पद्धतीचा वापर केला जातो. पीएम २.५ हे मायक्रॉनपेक्षा कमी व्यासाचे लहान कण असतात. हे कण श्वासाद्वारे सहजपणे रक्तप्रवाहात, फुफ्फुसांमध्ये आणि हृदयात प्रवेश करू शकतात.

हेही वाचा-विश्लेषण: ‘शत्रू संपत्ती’ विकून मोदी सरकार तिजोरी भरण्याच्या तयारीत, ही संपत्ती नेमकी असते तरी काय?

२०१४ मध्ये भारतात ‘कलर-कोडेड एक्यूआय इंडेक्स’ची नवीन प्रणाली सुरू करण्यात आली. या नवीन प्रणालीमुळे आपल्या परिसरातील हवेचा दर्जा किती खराब आहे, याची माहिती सामान्य नागरिक आणि सरकारी यंत्रणांनाही समजते. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीची पावलं उचलणं अधिक सोपं झालं आहे. एक्यूआय हे सहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलं आहे: “चांगले” (० ते ५०), “समाधानकारक” (५०-१००), “मध्यम प्रदूषित” (१००-२००), “खराब” (२००-३००), “खूप खराब ” (३००-४००), आणि “गंभीर” (४००-५००).

प्रदूषणाची नेमकी कारणं काय आहेत?

इंडियन अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (IARI) च्या एका अहवालानुसार, पीक काढून घेतल्यानंतर शेतकरी अनेकदा शेतातील पाचोळा गोळा करण्याऐवजी जाळून टाकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. यावर्षी पंजाबमध्ये सर्वाधिक शेतात आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारची शेतातील आग पीएम २.५ प्रदूषण वाढण्याचा मुख्य स्त्रोत आहे.

हेही वाचा- विश्लेषण : काजोलच्या ‘सलाम वेंकी’मध्ये दाखवलेला, प्रामुख्याने पुरुषांनाच होणारा ‘ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी’ कशामुळे होतो?

यामुळे कार्बन मोनॉक्साईड (CO), मिथेन (CH4), कार्सिनोजेनिक पॉलीसायक्लिक एरोमॅटीक हायड्रोकार्बन्स यांसारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. यामुळे वातावरणात धुक्याचा एक जाड थर तयार होतो. याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर आणि लोकांच्या आरोग्यावर होतो. विषारी हवेचा केवळ निरोगी लोकांच्या फुफ्फुसांवरच परिणाम होतो, असं नाही. आधीपासून श्वसनाचे आजार असलेल्या लोकांच्या अकाली मृत्यूलाही अशी हवा कारणीभूत ठरत आहे. ‘ग्रीनपीस’च्या एका अहवालानुसार, २०१७ मध्ये देशात सुमारे १२ लाखाहून अधिक नागरिकांचा वायू प्रदूषणामुळे अकाली मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why katihar is most polluted city in india how aqi measure bihar rmm
First published on: 16-11-2022 at 17:55 IST