Why Monsoon Starts From Kerala : यंदा मोसमी पाऊस वेळेपूर्वीच केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. साधारणपणे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जून असते आणि त्यानंतरच्या काही दिवसांतच तो महाराष्ट्रात दाखल होतो. यंदा मात्र आठवडाभरापूर्वीच केरळात मान्सून धडकणार असल्याचा कयास हवामान विभागाने बांधला आहे. दरवर्षी उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळण्याची प्रतीक्षा असताना एक प्रश्न कायम विचारला जातो आणि तो म्हणजे- मान्सून भारतात सर्वप्रथम केरळमधूनच का प्रवेश करतो? याचे उत्तर भारताची भौगोलिक रचना, समुद्रातून वाहणारे वारे, पृथ्वीचे परिवलन आणि भारतीय उपखंडाचा वैशिष्ट्यपूर्ण आकार यामध्ये दडलेले आहे.

मान्सून सर्वप्रथम केरळमध्येच का दाखल होतो?

दरवर्षी मान्सून केरळच्या किनारपट्टीवरूनच भारतात प्रवेश करतो, पण यामागे नेमके काय कारण आहे? याचे उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला हवामानशास्त्र आणि भौगोलिक रचना समजून घ्यावी लागेल. नैऋत्य मान्सून ही प्रामुख्याने महाकाय हंगामी वाऱ्यांची एक प्रणाली आहे. उन्हाळ्यात भारतीय भूभाग समुद्राच्या तुलनेत अधिक वेगाने तापतो. त्यामुळे उत्तर आणि मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्याचवेळी हिंदी महासागरावरील थंड हवा हा कमी दाब भरून काढण्यासाठी भारताकडे सरकते. आर्द्रतेने भरलेले हे वारे दक्षिण हिंदी महासागरातून भारतीय उपखंडाकडे प्रवास करतात. भारतात पोहोचण्यापूर्वी हे वारे विषुववृत्त ओलांडतात आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांची दिशा बदलते. हाच प्रभाव चक्रीवादळे आणि जागतिक वाऱ्यांच्या प्रवाहावरही परिणाम करतो. या प्रक्रियेमुळे हे वारे अरबी समुद्रावरून नैऋत्य दिशेने भारताकडे येतात. या पावसाळी वाऱ्यांच्या थेट मार्गात केरळ हे भारताच्या मुख्य भूमीवरील पहिले मोठे राज्य असल्याने मान्सूनचा प्रवेश सर्वप्रथम केरळमध्ये होतो.

केरळच्या भौगोलिक रचनेमुळे मान्सूनला गती

केरळच्या भौगोलिक रचनेमुळे येथे दाखल झालेल्या मोसमी पावसाला आणखीनच गती मिळते. राज्याच्या किनारपट्टीला समांतर असलेली पश्चिम घाट ही पर्वतरांग एका विशाल भिंतीप्रमाणे पसरलेली आहे. जेव्हा बाष्पयुक्त मान्सूनचे वारे या पर्वतांना धडकतात, तेव्हा ते वरच्या दिशेने ढकलले जातात. ही हवा जसजशी वर जाते, तसतशी ती वेगाने थंड होते आणि त्यातील बाष्पाचे रूपांतर ढगांमध्ये होऊन पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होते. वैज्ञानिक भाषेत या प्रक्रियेला ‘पर्वतीय पर्जन्यवृष्टी’ (ओरोग्राफिक रेनफॉल) असे म्हणतात. याच कारणामुळे मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात केरळ आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो. जर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर हा पश्चिम घाट नसता, तर द्वीपकल्पीय भारतातील मान्सूनचे स्वरूप कदाचित अगदी वेगळे असते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

इतर राज्यांत मान्सूनचे आगमन उशिराने का?

भारताला मोठी किनारपट्टी लाभलेली असताना तमिळनाडू किंवा गुजरातसारख्या इतर किनारपट्टीच्या राज्यांमध्ये मान्सून आधी का धडकत नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. वरकरणी हे राज्येही मान्सूनच्या मार्गात वाटत असली, तरी भारताची भौगोलिक रचना आणि वाऱ्यांची दिशा यामुळे ‘केरळ’ हेच मान्सूनचे नैसर्गिक प्रवेशद्वार ठरते. तमिळनाडू भारतीय द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात स्थित आहे. नैऋत्य मान्सूनच्या काळात हे राज्य पश्चिम घाटाच्या ‘पर्जन्यछायेच्या प्रदेशात’ येते. बाष्प घेऊन येणारे वारे पश्चिम घाटाचे पर्वत ओलांडण्यापूर्वीच आपला बहुतांश पाऊस तिथे पाडून मोकळे होतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तमिळनाडूत फारसा पाऊस पडत नाही. या राज्यात मुख्यतः ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान येणाऱ्या ईशान्य मान्सूनमुळे सर्वाधिक पाऊस पडतो. दुसरीकडे, गुजरात हे राज्य भौगोलिकदृष्ट्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अधिक उत्तरेकडे आहे.

मान्सूनच्या दोन प्रमुख शाखा कोणत्या?

मान्सूनचे वारे प्रथम अरबी समुद्रावर मजबूत होतात आणि नंतर भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत उत्तर दिशेने सरकत कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र मार्गे गुजरातमध्ये पोहोचतात. त्यामुळे तिथे मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी वेळ लागतो. भारतीय उपखंडाजवळ आल्यानंतर मान्सूनचे वारे प्रामुख्याने दोन मोठ्या शाखांमध्ये विभागले जातात. त्यातील पहिली शाखा अरबी समुद्रातून येते आणि सर्वप्रथम केरळच्या किनाऱ्यावर धडकते. त्यानंतर ती कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि पुढे गुजरातकडे सरकते. दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पुढे जाते. ही शाखा ईशान्य भारताकडे वळते आणि नंतर गंगा खोऱ्यातील मैदानांमध्ये पसरते. यामुळेच केरळपासून भौगोलिकदृष्ट्या दूर असतानाही ईशान्य भारतात मान्सूनचे आगमन लवकर होते.

मान्सूनची घोषणा कधी केली जाते?

केरळमध्ये केवळ एक दिवस पाऊस पडला म्हणजे मान्सून आला, असे होत नाही. मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून अनेक वैज्ञानिक घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये निश्चित केलेल्या हवामान केंद्रांवर ठराविक प्रमाणात आणि सलग पाऊस होणे गरजेचे असते. तसेच, वाऱ्यांचा वेग आणि त्यांची योग्य दिशा (नैऋत्येकडून येणारे वारे) तपासली जाते. त्याशिवाय हवेमध्ये किती उंचीपर्यंत बाष्प (दमटपणा) पसरले आहे, याचाही अभ्यास केला जातो. हे सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर आणि ते काही काळ टिकून राहिल्यानंतरच हवामान खात्याकडून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली जाते. केरळमधील आगमनाची तारीख महत्त्वाची असते, कारण त्यावरूनच देशाच्या इतर भागांत मान्सून कसा पुढे सरकेल, याचा अंदाज लावता येतो. यंदा मान्सून केरळमध्ये लवकर दाखल होत असला, तरी संपूर्ण हंगामाचा अंदाज पाहता हवामान खात्याने काहीसा सावध पवित्रा घेतला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा भारतातील पावसाचे प्रमाण ‘दीर्घकालीन सरासरीच्या’ ९२ टक्के राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याला सामान्यपेक्षा कमी श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.

अल निनोचा मान्सूनवर काय परिणाम होतो?

हवामान तज्ज्ञांनी यामागे हंगामाच्या उत्तरार्धात निर्माण होऊ शकणाऱ्या अल निनोचा उल्लेख केला आहे. तज्ज्ञांच्या मते, मान्सून लवकर सुरू झाला म्हणजे संपूर्ण हंगामात चांगला पाऊस पडेलच असे नाही. मान्सूनच्या आगमनाची तारीख आणि एकूण हंगामी पावसाचे प्रमाण यांचा थेट संबंध नसतो, असेही अनेकदा स्पष्ट करण्यात आले आहे. ‘अल निनो’ ही एक जागतिक हवामान प्रणाली आहे, ज्यामध्ये प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान असामान्यपणे वाढते. जरी ही घटना भारतापासून हजारो किलोमीटर दूर घडत असली, तरी ती संपूर्ण जगाच्या हवामान चक्रावर परिणाम करते. अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे वारे कमकुवत होतात, पावसाचे प्रमाण कमी होते आणि पावसाच्या दिवसांमध्ये मोठा खंड पडतो. तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे शेती आणि पाणी पुरवठ्यावरही मोठा ताण येतो. अनेक अभ्यासांमध्ये भारतातील दुष्काळी वर्षांचा संबंध अल निनोच्या परिस्थितीशी आढळून आला आहे. त्यामुळे यंदाचा मान्सूनवर त्याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.