समाजाने एकत्र यावे आणि अन्यायाविरुद्ध संघटीत व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. पण स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे रूप बदलत गेले आणि मूळ उद्देश बाजूलाच पडला; मात्र काही गणेशोत्सव मंडळे आजही हे व्रत जपत आहेत. नवी मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी देखावे आणि चलचित्रांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.

आग्रोळी गावाने ‘एक गाव  एक गणपती’ची परंपरा जपून पर्यावरणरक्षणाचा वसा जपला आहे. नेरुळ सेक्टर २,८,१०मधील लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती मंडळाने अवयवदानाचा देखावा उभारला आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत असून मंडळाचे यंदाचे अठ्ठावीसावे वर्ष आहे. मंडळामध्ये ‘मरावे परि किर्तीरुपी उरावे’ असा आशय मांडण्यात आला आहे. महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, संत गाडगे महाराज,मदर तेरेसा, बाबा आमटे यांच्या कार्याची महती देण्यात आली आहे. त्यांच्याएवढे मोलाचे योगदान आपल्याला देता येणे शक्य नसले तरी आपल्या मृत्यनंतर अवयवदान करून आपण इतरांना जीवदान देऊ  शकतो. अन्न व संपत्ती दानापेक्षा अवयव दान करून माणुसकी दाखवावी, असा संदेश देखावा आणि चलचित्राद्वारे देण्यात आला आहे. देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहेत.

वाहतूक नियमांच्या पालनाचे आवाहन

सीवूड्स रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन सेक्टर ४८ यांच्या गणेशोत्सवाचे यंदाचे पंधरावे वर्ष असून दरवर्षी देखाव्यातून सामाजिक संदेश देण्यात येतो, असे अध्यक्ष रवींद्र महाडीक यांनी सांगीतले. वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या याविषयी या देखाव्यातून प्रबोधन करण्यात आले आहे. वाहतुकीचे नियम पाळून शहराचे बकालपण दूर करूया असा संदेश या मंडळाच्या देखाव्यांतून देण्यात आला आहे. वाहतूक नियमांची चलचित्रे व विविध घोषवाक्ये लिहून आकर्षक देखावा तयार करण्यात आला आहे. सीवूड्स रेल्वेस्थानकात जाण्यासाठी मॉलच्या भिंतीचा अडथळा दूर करण्यासाठी स’ाांची मोहीमही मंडळ राबवत आहे.

व्यसनमुक्तीचा जागर

नवी मुंबईतील सर्वात पहिले गणेशोत्सव मंडळ तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाने व्यसनाधिनता एक विषारी विळखा, या विषयावर अतिशय मार्मिक देखावा साकारला आहे. अंकुश वैती हे या मंडळाचे अध्यक्ष असून मंडळाचे हे ४७ वे वर्ष आहे. विविध आयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये असलेल्या नवी मुंबईत १२५ हुक्कापार्लर आहेत. इथे येणारे तरुण विद्यार्थी विविध व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना व्यसनांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सचिन तेंडुलकपर्यंत अनेकांची उदाहरणेही दिली आहेत.

झाडालाच गणरायाचे रूप

शिवआधार चॅरिटेबल ट्रस्ट, शिवाजीनगर नेरुळ या संस्थेतील सदस्यांनी पदपथावरील एका झाडालाच गणेशाचे रूप दिले आहे. झाडाला कोणत्याही इजा न करता मुकूट, हार घालून आणि पितांबर नेसवून गणपती बनवले आहे. या वृक्षरूपी गणरायाची पूजा केली जात आहे. ‘मी दगडात नाही, मी देवळात नाही, मी झाडात आहे. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश या संस्थेने दिला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष गणेश शेळके यांनी सांगितले.