श्रीवल्लभेश

श्रीगणेशाच्या दशभुज श्रीवल्लभेश रूपाचे मुद्गल पुराणांत वर्णन शास्त्रानुसार केलेले आहे. श्रीवल्लभेशांच्या दहा हातांत बीजापूर नामक फळ, गदा, धनुष्य-त्रिशूळ, चक्र, कमळ, पाश, खंडीत दात अशा दहा गोष्टी आहेत. हे दहा हातांचे स्वरूप असते. हा वल्लभेश म्हणजेच श्रीगजानन होय शास्त्रकार म्हणतात. गजानन म्हणजेच श्रीगणेश होय. गणेश म्हणजेच गुणांचे ईशत्व.

शास्त्रात तीन गुण महत्त्वाचे वर्णिले असले तरी त्याच्याद्वारे कार्य पूर्ण होणेकरिता देवतांची संख्या पाच रूपात वर्णिली आहे. सत्त्वगुण, रजोगुण तथा तमोगुण हे तीन गुण सर्वज्ञात आहेतच. त्यांच्या प्रधानत्वाने युक्त देवता रूपात आपण अनुक्रमे श्रीहरी, श्रीब्रह्मदेव तथा श्रीशंकरांना जाणतो. मात्र या त्रिदेवांसह श्रीदेवी तथा सूर्याच्या द्वारे देवतापंचक पूर्ण होते. तीन गुणांसह आकर्षण तथा ज्ञान या दोन बाबीही जगत संचलनार्थ आवश्यक असतात. त्यांचेसह हे पंचक पूर्ण होते. या पांचही देवतांचे मूळ स्वरुप आहे श्रीगणेश. पांचही देवता पाच वेगवेगळ्या रूपांत प्रगट होऊन आपल्या कार्यास आरंभ करण्यापूर्वीचे पाचांचे एकात्मरूप म्हणजेच श्रीवल्लभेश.

वेगवेगळ्या शब्दांत हे पंचेश्वर निर्माते, पालक, संचालक आहेत. श्रीवल्लभेश त्यांचे हे पंचेश्वर संचालकत्व दाखविणेची शास्त्रीय पद्धती आहे, दशभूतत्त्व. भुजा हे आपल्याकडे शक्तीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. या पांचही देवतांची शक्ती ही मूलत: श्रीगणेशाचीच आहे, हे सांगण्याकरिता पांचाच्या भुजांनी युक्त हे दशभुज स्वरूप असते. त्यांतील ही हत्यारेच पुढे त्या पंचेश्वरांना मिळतात असे गाणपत्य संप्रदाय सांगतो.

लंबोदर

आपल्या या सकल ब्रह्मांड स्वरूपाचे रहस्य स्वत: भगवान श्रीगणेशांनीच श्री मुदगल पुराणांत सांगतले आहे. तिथे पंचम खंडात लंबोदर विनायकाचे चरित्र वर्णिले आहे. त्या लंबोदर अवतारांत भगवान स्वत:च म्हणतात, हे सकल विश्व माझ्याच उदरातून उत्पन्न होते. मीच माझ्या उदरांत याला विलीन करून क्रीडा करतो. याच कारणाने मला लंबोदर म्हणतात. सकल विश्वाच्यासह या श्लोकांत सगळ्या ब्रह्माचाही विचार करण्यात आला आहे. ब्रह्मा, विष्णू महेश्वरांसाठी सकल ब्रrोही आपल्याच उदरांतून उत्पन्न होतात.

थेऊर क्षेत्राच्या कथेत लंबोदरत्वाचा असाच एक संदर्भ आलेला आहे. ऊँ कारातून श्री ब्रह्मदेव विरक्त झाले. त्यांना आज्ञा मिळाली की, सृष्टी निर्माण करा. पण प्रश्न होता की, सृष्टी म्हणजे काय? काय, करायचे. नेमके तेच माहीत नाही. अशा चिंतेने ग्रस्त ते श्रीचिंतामणीस शरण गेले. भगवान प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने आपली समस्या सांगितली. मोरयाने अद्भूत उपाय केला. सोंडेने ब्रह्मदेवांना उचलले आणि सरळ गिळून टाकले. ब्रह्मदेव त्या लंबोदराच्या उदरात गेले. त्यांनी तेथील अनंत कोटी ब्रह्मांडे पाहिली. त्यांचा रचनाचा अभ्यास केला. समजून घेतले. पुनरपी प्रार्थना केली आणि ब्रह्मदेव बाहेर आले आणि मग त्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी विश्वाची निर्मिती केली. श्रीब्रह्मदेवांनी ज्यांच्या उदरांतून विश्वनिर्मितीची प्रक्रिया जाणली, त्या गणनाथांस लंबोदर असे नाव प्राप्त झाले. हा लंबोदराचा मुलार्थ आहे.

चिंतामणी

श्रीगणेशाच्या विविधत क्षेत्रांवर जी अत्यंत प्रिय नावे रूढ आहेत त्यापैकी एक कदाचित सर्वाधिक प्रचलित नाव आहे चिंतामणी. अगदी गावागावांतदेखील चिंतामणी नावाच्या गणपतीची मंदिरे आहेत. त्याचे कारण शब्दाच्या अर्थात आहे. ‘चिंता हरतो मनांतली तो चिंतामणी!’ ही चिंतामणी शब्दाची भक्तांना प्रिय व्याख्या आहे. सामान्यजन साधना मार्गाला लागतात तेच संसारस्थ चिंतांनी ग्रासले असल्यामुळेच, त्यामुळे त्या चित्तास शांत करणारा, चिंता दूर करणारा चिंतामणी भक्तांना अधिक जवळचा वाटतो. सृष्टीच्या आरंभी विचलित झालेल्या श्री ब्रह्मदेवांच्या चिताला स्थिर करण्यासाठी (स्थावर) थेऊर क्षेत्री प्रगटलेले भगवान चिंतामणीच आहेत आणि स्वस्थानावरून पदच्युत झालेल्या देवराज इंद्राच्या सगळ्या चिंता दूर करीत त्यांना पुनरुपी देव सिंहासनांवर विराजित करणारे श्री क्षेत्र कळंबचे गणराज हे चिंतामणीच.

मूषकेश

मूषकाचाच विचार करता मूषक वाहन, मूषक ध्वज याशिवाय श्रीगणेशांचे आणखी एक नाव शास्त्रांत प्रसिद्ध आहे ते म्हणजे मूषकेश. या नावांच्या अर्थातही मूषकाचा काळाशी असलेला संबंध लक्षात घेता मोरयाच्या कालत्रयाती तत्त्वाचा तर विचार करता त्याच्या पुढेही जात श्री मुद्गुल पुराणकारांनी मूषक शब्दाचा आणखी एक आगळावेगळा अर्थ मांडला आहे.

मूष हा संस्कृतमधील एक धातू आहे. त्याचा अर्थ चोरणे असा होतो. जो चोरी करतो तो मूषक. या न्यायाने मूषक शब्द इथे ईश्वरास तथा देहपरत्वे जिवास लाविला जातो. जीव या देहात राहून सगळ्या भोगांचा भोग घेतो. वरपांगी भोग भोगतो तो देह. इंद्रियांद्वारे सर्व संवेदना ग्रहण केल्या जातात. मात्र शेवटी त्या संवेदना ग्रहण करणाऱ्या इंद्रियांना नव्हे तर जीवात्म्यास चोर आणि पर्यायी शब्दरूपांत मूषक म्हणतात. असा सकल जीवांचा संचालक असतो तो मोरया, तो मूषकेशच ठरतो. श्लोकांत वर्णन जीवाचे नाही तर ईश्वराचे आहे. जीवाचे वर्णन येते ते व्यक्तीच्या पातळीवर. अर्थात व्यक्तिगत विचार असेल तेव्हा त्या चैतन्यास जीव म्हणतात जो देहात राहून देहाचे संचालन करतो. तर समष्टीच्या पातळीवर अर्थात विश्वाच्या पातळीवर चैतन्यास ईश्वर म्हणतात. ईश्वरही असाच विश्वासाच्या आत राहून गूढ रूपात विश्वसंचालनाचा आस्वाद घेत असतो. अत: ईश्वरास मूषक म्हणतात. अशा अनंत कोटी विश्वाच्या सगळ्या ईश्वराच्या संचालक परमेश्वरूप गणनाथांना शास्त्रकार मूषकेश अशा रूपांत आठवितात.

श्री धूम्रवर्ण 

धूम्र या शब्दाचा अर्थ आहे धूर. तर धुराचा परिणाम काय तर धूर सर्वत्र आवरण निर्माण करतो. धूर हा जड पदार्थ असल्याने जड दृष्टी तथा जड पदार्थात हा धूर अडसर निर्माण करतो. धूम्रवर्ण शब्दात दुसरा शब्द आहे वर्ण. वर्ण म्हणजे रंग. आपल्या सगळ्यांना आपल्या शरीरास एक रंग असतो. त्वचा हा सामान्यत: शरीराचा सर्वात बाह्य़ भाग आहे. शरीराच्या प्रत्यक्ष जड घटक रूपांत ते सत्यही आहे; पण त्वचेच्याही आधी लक्ष जाणारी गोष्ट आहे त्वचेचा रंग. त्वचेचा संबंध आहे स्पर्शाशी. स्पर्शाकरिता संलग्नता हवी, सामिप्य हवे. मात्र रंगाचा संबंध आहे दृष्टीशी. त्यासाठी जवळ जाण्याची जरुरी नाही. रंग दुरूनही कळणारा विषय आहे. मोरयाचा रंग धुराचा आहे. त्यामुळे मोरयाची त्वचा दिसणार नाही. मग जिथे त्वचाच दिसत नाही तिथे अंतरंग दर्शन फारच दूरची गोष्ट झाली. अर्थात मोरया सामान्य नजरेने वरपांगी पाहून कळणार नाही. त्यासाठी शास्त्रयुक्त गुरुकृपाच युक्त दृष्टीच पाहिजे. हे सांगण्याची शास्त्राची रीती आहे धूम्रवर्णत्व.
श्री मुद्गल पुराण म्हणते – ‘धूम्रवर्णावृतमेव यद दृश्यते न जर्नेर्यथा। तथा वस्तु गणेशानं न जानन्ति शिवादय:।
अर्थ – जसे धुराने आवृत झाल्याने सामान्य माणूस दिसत नाही तद्वत मोरयाचे यथार्थ रूप श्री शिवादिकांनाही सहज कळत नाही. त्यामुळेच गणेशास म्हणतात धूम्रवर्ण!

श्रीशूर्पकर्ण

भगवान आपल्याकडे पाहील की पाहून घेऊ म्हणेल, अशा मागणीकर्त्यांच्या सगळ्या मागण्या या सामान्य संसारातील असतात. अशा मागण्या भगवंतासमोर मागणे म्हणजे एखाद्या राष्ट्रपती भवनात जाऊन फाटके वस्त्र मागण्यासारखे आहे. किती विचित्र नजरेने पाहील भगवान! पण तो पाहातच नाही, कारण तो ही सगळी सूची ऐकतच नाही. का ऐकत नाही? तर त्याचे कान सुपासारखे आहेत. त्यामुळे हा कचरा बाहेरच उडवला जातो. तो भगवंताच्या मस्तकात जात नाही. बुद्धीपर्यंत पोहोचतच नाही. मग भगवंताची बुद्धी ही त्यावर प्रतिक्रिया देत नाही. आपल्याला वाटत असते तो ऐकतच नाही. जिथे बुद्धीपर्यंत पोहोचतच नाही तिथे बुद्धिपतीपर्यंत कसे पोहोचणार. भगवान असा कचरा उडवून लावतात. मग ते ऐकतात का? तर जगात आपलीही रचना पाहा. आपल्याला ऐकायला सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती असते? तर ते आहे आपले नाव. त्याच नावाच्या अन्य कोणालाही कोणी हाक मारली तर आपण पलटतो. कारण आपल्याला आपले नाव ऐकायला आवडते. भगवंताचेही तसेच आहे. त्या शूर्पकर्णाच्या कानांतून आत फक्त एकच बाब जाते ती म्हणजे श्री गजानन। श्री गजानन.

मोहन शिरगावकर
response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा