लांबलेल्या पावसाच्या दमदार आगमनासह प्रारंभ झालेल्या गणेशोत्सवातील आकर्षक देखाव्यांना यंदा दर्शकांच्या घटलेल्या गर्दीला सामोरे जावे लागले. दरवर्षी दिसणारा देखाव्यांच्या गर्दीचा नजारा या वर्षी मात्र अभावानेच पाहावयास मिळाला. आता शेवटचे दोन दिवस बाकी असल्याने उत्सवातील देखावे पाहण्यास दर्शकांची गर्दी उसळू लागेल, अशी गणेश मंडळांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. या वर्षी डेंग्यूमुळे शहरात तब्बल दहाजणांचा बळी घेतला. त्याचे व वेगवेगळ्या साथीच्या आजारांचे पसरणारे सावट या वेळच्या देखाव्यांची गर्दी घटण्यास साह्य़भूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
गणेशोत्सवातील देखावे म्हटले की, संध्याकाळनंतर प्रमुख रस्ते, चौक प्रेक्षकांच्या हमखास सुरू होणाऱ्या गर्दीने बहरून जात असल्याचे सर्वपरिचित चित्र. रात्री उशिरापर्यंत स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी, लहान मुले, वृद्ध असे सगळेच एका वेगळ्याच उत्साहात देखावे पाहण्यास गर्दी होत असल्याचे दृश्य यंदा मात्र अभावानेच पाहावयास मिळाले. गर्दी घटण्यास असणाऱ्या कारणांमध्ये गेल्या काही दिवसांत शहर व परिसरात पसरलेल्या डेंग्यूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा समावेश आहे. शहरात तब्बल दहाजणांचा डेंग्यूने बळी घेतला. त्याचे मोठे सावट यंदाच्या उत्सवावर होते. देखावे पाहण्यास लोटणाऱ्या गर्दीवर याचा बराच परिणाम दिसून आला. त्यातच शहरातील डेंग्यू व इतर साथरोगांचा प्रादुर्भाव कमी होण्याचे चिन्ह सध्या तरी दिसत नाही. शहराच्या काही भागात डेंग्यूचा त्रास मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. गुलमंडी, चिकलठाणा, सिडको, हडको, वाळूज, पंढरपूर, बजाजनगर, केळीबाजार आदी भागांत गणेश मंडळांनी गणेशमूर्तीची स्थापना करून आकर्षक देखावे तयार केले असले, तरी प्रामुख्याने तरुणाईची होणारी गर्दी सोडल्यास प्रौढ, वृद्ध मंडळी मात्र घरी बसूनच केबलच्या माध्यमातून देखाव्यांचा आनंद घेणे पसंत करीत आहेत.