गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या; अशा गजरात जिल्ह्यातल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत झालेल्या विसर्जनादरम्यान कुठल्याही अनुचित घटनेची नोंद झाली नाही.नांदेड शहर व जिल्ह्यात सुमारे दोन हजार गणेश मंडळांच्या वतीने श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणेश चतुर्थीपर्यंत जिल्ह्यात पावसाची वक्रदृष्टी होती पण गणरायाच्या आगमनानंतर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर आल्याने गणेशोत्सवादरम्यान उत्साहाचे वातावरण होते. सोमवारी अनंतचतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळ व गणेश भक्तांनी गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरात विघ्नहर्त्यांला निरोप दिला.सकाळपासूनच विविध भागातून मिरवणुकांना प्रारंभ झाला. गोवर्धनघाट, बंदाघाट, नगीनाघाट, सांगवी व पासदगाव आदी भागात गोदावरी व आसना नदीपात्रात लाडक्या बाप्पाचे विसर्जन झाले. दुपारी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला. ढोल-ताशाच्या गजरात गुलाल उधळत व गणपतीबाप्पा मोरयाचा गजर करीत निघालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. शहरात ठिकठिकाणी गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात अनेक वेळा पावसाने हजेरी लावली पण गणेशभक्तांच्या उत्साहावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नांदेड शहरात श्री विसर्जनदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वत: पोलीस अधीक्षक परमजितसिंग दहिया, सहायक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या भागात तळ ठोकून होते.