scorecardresearch

Premium

Anant Chaturdashi 2023: अनंत चतुर्दशीलाच का केले जाते बाप्पाचे विसर्जन? जाणून घ्या, यंदाचा विसर्जनाचा मुहूर्त

अनंत चतुर्दशीला का केले जाते बाप्पाचे विसर्जन? दहा दिवसांनी गणरायचे विसर्जन करण्यामागे काय आहे कारण? तुमच्या या प्रश्नांची उत्तरे आज आम्ही देणार आहोत.

Anant Chaturdashi 2023
अंनत चतुर्दशी आणि बाप्पाचे विसर्जन, जाणून घ्या काय आहे संबध (फोटो- पीटीआय)

Anant Chaturdashi 2023: महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचे आगमन होते. विधीपूर्वक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. दहा दिवसांचा हा गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. त्यानंतर अनंत चतुदर्शीला गणपती मूर्तीचे विसर्जन केले जाते. काही जणांकडे दीड दिवसांनी, काही जणांकडे पाच किंवा सात दिवसांनीही गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. पण, गणेशोत्सव संपूर्ण दहा दिवस साजरा केला जातो. दहाव्या दिवशी गणरायचा निरोप घेताना सर्वांच्या डोळ्यात पाणी दाटून येते. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनंती करत बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. पण, राहून राहून सर्वांच्या मनात एक प्रश्न कायम येतो तो असा की, अनंत चतुर्दशीला का केले जाते बाप्पाचे विसर्जन? दहा दिवसांनी गणरायचे विसर्जन करण्यामागे काय आहे कारण? तुमच्या या प्रश्नांची उत्तरे आज आम्ही देणार आहोत.

यंदा अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबर, गुरुवारी येत आहे. अनंत चतुर्दशी हा सण भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्याच्या चौदाव्या दिवशी अनंत चतुर्दशी येते. या दिवशी १० दिवसांचा गणेशोत्सव संपतो, म्हणून या दिवसाला अनंत चतुर्दशी म्हटले जाते. चतुर म्हणजे चार आणि दशी म्हणजे दहा.

याच दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जनही केले जाते

अनंत चतुर्दशी २०२३ ला गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. २८ सप्टेंबर २०२३ रोजी गणपती विसर्जनासाठी तीन शुभ मुहूर्त आहेत. या दिवशी गणपती विसर्जनासाठी सकाळी ०६:११ ते ०७:४०, त्यानंतर सकाळी १०:४२ ते ०३:१० आणि दुपारी ०४:४१ ते ०९:१० अशी शुभ वेळ असेल.

हेही वाचा – Ganesh Chaturthi 2023 : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे महत्त्व आणि इतिहास, जाणून घ्या; कसे घ्याल दर्शन?

अनंत चतुर्दशीचा इतिहास

दहा दिवसांनी गणरायाचे विसर्जन का केले जाते किंवा अनंत चतुर्दशीलाच का केले जाते? याबाबत एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. या कथेनुसार, गणरायाने महाभारत ग्रंथ लिहिला असे मानले जाते. असे म्हणतात की, ऋषी वेद व्यास यांनी महाभारत आत्मसात केले होते परंतु, ग्रंथ लिहिण्यास ते असमर्थ होते. हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना एक असा व्यक्ती हवा होता, जो अखंड ग्रंथ लिहू शकेल. ही समस्या घेऊन ते ब्रह्म देवाकडे गेले आणि त्यांना प्रार्थना केली. ब्रह्म देवांनी त्यांना सुचवले की, गणपती हा बुद्धिची देवता आहे. हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी गणेश तुम्हाला नक्कीच मदत करू शकतील.

हे ऐकून ऋषी वेद व्यास गणपतीकडे गेले. महाभारत लिहिण्याची विनंती त्यांनी गणरायाला केली आणि गणेशाने त्यांना होकार दिला. ऋषी वेद व्यासांनी चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली आणि गणपती बाप्पा न थांबता लिहित राहिले. दहाव्या दिवशी ऋषी वेद व्यासांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांना दिसले की, गणेशाच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. तेव्हा ऋषी वेद व्यास यांनी बाप्पाच्या शरीरावर मातीचा लेप लावला. शरीराला थंडावा मिळावा यासाठी ऋषी वेद व्यास यांनी लेप सुकल्यानंतर गणेशाला नदीत स्नान करण्यासही सांगितले. हा दिवस अनंत चतुर्दशीचा दिवस होता. म्हणूनच गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते, असे मानतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anant chaturdashi 2023 why is bappas immersion done only on anant chaturdashi know this years immersion time snk

First published on: 27-09-2023 at 18:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×