अजून बरंच काही धन्याच्या मनात साठलं होतं. त्याला मार्ग मोकळा करून देण्याशिवाय पर्याय नव्हता. धन्या जे बोलत होता ते पटण्यासारखंच होतं. पण त्याने जो पर्याय शोधला होता तो काही केल्या मनाला पटत नव्हता. घरात ढेकूण झालेत, जळमटं झालीयेत, डास झालेत म्हणून कोणी घर सोडून जातं का?

सर्वजण पाच-सात पेग डाऊन होते, पण कुणालाच पेगच्या संख्येच्या मानाने म्हणावी तशी नशा झाली नव्हती. सर्वजण अंतर्मुख वगैरे झाले होते.

‘तू घडव मग सुधारणा. नुसतं ‘हे नाही, ते नाही’ असं म्हणण्यात काय अर्थ आहे?’

धन्या एकदम उखडलाच. ‘काय वाट्टेल ते काय बोलताय तुम्ही? बिघडलेल्या गोष्टींमध्ये सुधारणा घडवता येते; सडलेल्या गोष्टींमध्ये नाही. नासलेल्या दुधापासून एक वेळ पनीर बनवता येतं, पण सडलेलं दूध टाकूनच द्यायला लागतं मित्रांनो.’

‘नशीब  दारू कधी सडत नाही..’तेवढय़ातल्या तेवढय़ात कुणीतरी विनोद केला.

तेवढय़ाच मिश्कीलपणे धन्या म्हणाला, ‘पदार्थ सडवूनच ती  बनवतात. त्याचे दूरगामी परिणाम हे सर्वनाश होण्यातच आहेत.’ अचानक काहीतरी आठवल्यासारखं धन्या बोलून गेला- ‘बाप रे! कुणाला सुधारा असं म्हणणं म्हणजे डायरेक्ट जीवाशी खेळच. करायला गेलो सुधारणा आणि दिवसाढवळ्या कुणी माझा खून केला तर काय करायचं? केला तरी ठीक आहे; पण ते गुन्हेगार या देशात मोकाट फिरतील याची किळस येते. डॉक्टर दाभोलकरांचं काय झालं? सर्वसामान्य, भोळ्याभाबडय़ा जनतेसाठी प्रगतीचा मार्गच सांगत होते ना ते! अजूनही त्यांच्या खुन्यांचा शोध घेण्यासंबंधी कुणी ठोस पावलं उचलतील अशी लक्षण दिसत नाहीत. त्याबाबतीत सरकारी धोरण किती उदासीन आहे हे जगजाहीरच आहे. त्यांनी सुरू केलेलं कार्य बंद पडणार नाही, पण तरीसुद्धा अंधश्रद्धेच्या अंधाऱ्या डोहात खितपत पडलेल्यांना प्रगतीकडे नेणारा एक डोर कापला गेला ना! हे सगळं बघून मला काही समाजसुधारक वगैरे होण्याची इच्छा नाही. फक्त माझ्या वाटय़ाला आलेलं आयुष्य या जमिनीवर आणि या आकाशाखाली आनंदात जगावं एवढीच इच्छा होती. माझा संसार, माझी मुलंबाळं सुरक्षित वातावरणात नांदावी ही अपेक्षा असणं चुकीचं आहे का? उद्या कुणाच्यातरी बेफिकिरीमुळे दारूच्या नशेत कुणा श्रीमंताच्या गाडीखाली माझं मूल येऊ नये ही अपेक्षा करणं चुकीचं आहे का? मान्य आहे- अपघात हा कुठेही होऊ शकतो. पण दुसऱ्याच्या बेफिकिरीमुळे माझं नुकसान होण्याच्या शक्यता मी कमी करू शकतो. इथल्या प्रदूषणाची पातळी धोक्याची सीमा उलटून गेली आहे. त्याबाबत कुणी काही ठोस उपाययोजना करतील अशी दूरदूपर्यंत शक्यता नाही. रोज रस्त्यांवर नवीन गाडय़ांची भर पडतेच आहे. आणि त्यामुळे दिवसेंदिवस असुरक्षितता आणि प्रदूषणाची पातळी वाढतेच आहे. काय देणार आपण पुढच्या पिढीला? मळकटलेले, धुरकट श्वास आणि त्यामुळे होणारे श्वसनाचे विकार? माझी बायको किंवा मुलगी कुणा नराधमांच्या बलात्काराची बळी होऊन आयुष्यभर दु:खात खितपत पडू नये अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे का? आणि त्यातून बलात्कार करणाऱ्यांची वयोमर्यादा कमी असेल तर त्यांना फासावर लटकवण्याऐवजी सुधारगृहात पाठवलं गेलं तर..? आणि जर ती श्रीमंतांची पैदास असेल तर मग ते उजळ माथ्याने समाजात फिरणार आणि ‘कशी मजा लुटली!’ या अर्थाच्या गप्पांचे अड्डे जमवणार. वास्तविक गुन्हा सिद्ध झाल्यानंतर- मग ते कोणीही असोत- अशा गुन्हेगारांना भरचौकात उभं करून दगडांनी ठेचून मारलं पाहिजे. माझ्या कुटुंबावर अगदी अशीच वेळ कदाचित येणारही नाही; पण आज कित्येक कुटुंबे याच देशात, याच समाजात या हिडीस कृत्याला बळी पडली आहेत आणि अस्वस्थ मन:स्थितीत हतबल आयुष्य जगत आहेत. याच निर्दयी समाजव्यवस्थेचा भाग म्हणून मी जगत आहे. आणि या गोष्टींबद्दल माझ्या मुठी आवळल्या जाणार नसतील तर आजपर्यंत पाठय़पुस्तकांतून जी प्रतिज्ञा मी घोकत आलो त्याला काय अर्थ आहे? ही संपूर्ण प्रतिज्ञा आपल्यापैकी कितीजणांना आठवते? ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे..’ ही पहिली तीन वाक्ये आठवली तरी जीवाची घालमेल होते. तुम्ही जेव्हा कुठल्या मोठय़ा पदावर पोहोचता आणि तुमच्यावर महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून असतात, तेव्हा तुमची जबाबदारी मोठी असते. ती जबाबदारी पेलण्यासाठी तुम्ही लायक आहात म्हणून तुम्ही त्या पदावर आहात, हे मी माझ्या नोकरीत शिकलो. आपल्या कुठल्या राज्यकर्त्यांना त्यांची जबाबदारी कळली आहे असं तुम्हाला वाटतं? जबाबदारी म्हटलं की राजकारण्यांचा खो-खो सुरू होतो. आपली जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलण्याच्या कौशल्याची चढाओढ सुरू होते.

‘जबाबदारीवरून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. नुकताच मी व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडीयो बघितला. गाईसाल या ठिकाणी झालेल्या एका रेल्वे अपघाताबद्दल तो वक्ता बोलत होता. त्या अपघातात साडेपाचशे जण मेले. त्यातले चारशेपेक्षा जास्त जण ईशान्य भारतात डय़ुटीवर निघालेले भारतीय जवान होते. एकाच रुळावरून दोन फास्ट ट्रेन आल्या आणि त्यांची समोरासमोर टक्कर होऊन हा अपघात झाला. कशा आल्या? दिल्लीवरून आसामकडे जाणारी ट्रेन जी अप ट्रॅकवरून जायला हवी ती डाऊन ट्रॅकवरून आली. आणि त्याच वेळेला डाऊन ट्रॅकवरून समोरून दुसरी ट्रेन आली. ज्या ठिकाणी तो अपघात झाला त्या ठिकाणोपासून नव्वद किलोमीटर- म्हणजे तीन स्टेशन आधीपासून ही ट्रेन चुकीच्या ट्रॅकवरून आली. कारण तिथे जो लाइन्समन होता, ज्याने खटका ओढून ट्रॅक बदलायचा होता, तो दारू पिऊन पळून गेला होता. त्यामुळे ती ट्रेन डाऊन ट्रॅकवरून पुढे पुढे येतच राहिली. आधीच्या तीन स्थानकांवर ट्रेनला हिरवा कंदील मिळाला. ज्या तीन लोकांनी त्या ट्रेनला हिरवा कंदील दिला ते काय झोपेत होते, की दारूच्या नशेत होते? जबाबदारी चुकवण्यामुळे केवढा अनर्थ घडणार आहे याची त्यांना तेव्हा कल्पना तरी आली असेल का? आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो.. कारगिलमध्ये जे युद्ध झालं, ते दीड महिना चाललं. त्यामध्ये जे जवान शहीद झाले त्यांची संख्या तीनशे चौसष्ठ आणि केवळ कर्तव्यातील चुकारपणामुळे बेजबाबदारीने जो हिरवा कंदील दिला गेला आणि ज्यामुळे हा अपघात घडून आला त्यात गेलेल्या जवानांची संख्या साडेचारशे. आता मला सांगा- या देशाचे सर्वात मोठे शत्रू कोण? युद्धाच्या कहाण्या ऐकून भारावून जाऊन प्रत्येकानेच लष्करात जायला पाहिजे असं नाही, तर आपण जगतो तो प्रत्येक क्षण सावध होण्याचा आहे, लढायचा आहे. मी आयुष्यभर या अशा बेजबाबदार वातावरणात राहूच नाही शकणार. माझ्याकडे एकच आयुष्य आहे- जे मला सशक्त वातावरणात घालवायचे आहे. देश कुठलाही असो, मला फरक पडत नाही..’

आम्ही सगळे सुन्न होऊन हे ऐकत होतो. कुणाच्याही तोंडातून चकार शब्द फुटत नव्हता. सगळ्यांची होती-नव्हती तेवढी नशापण उतरली. का कुणास ठाऊक, उगाच अपराधी वाटायला लागलं होतं. धन्या जी बडबड करत होता ती निर्थक नव्हती. रोजच्या धकाधकीच्या जगण्यात असा विचार कधीच केला नव्हता.

धन्या पुढे बोलायला लागला, ‘अजून एका जवानाची गोष्ट सांगतो. भुसावळजवळच्या गावात बाबुलसिंग रजपूत नावाचा एक जवान राहत होता. त्याला एक दिवस डय़ुटी जॉइन करण्यासंबंधी आर्मीचं वॉरंट आलं. अमुक एका तारखेला तमुक एक वाजता डय़ूटी जॉइन करा.. आर्मी एवढंच सांगत असते. कसे या, हे तुमचं रिझव्‍‌र्हेशन, हे तुमचं एसीचं तिकीट, वगैरे काही नाही. ‘यू हॅव टू डू ऑर टू डाय अ‍ॅण्ड नेव्हर टू आस्क व्हाय..’ हे लॉर्ड टेनिसनच्या एका अजरामर, विश्वविख्यात कवितेतलं वाक्य आहे- ‘इन टू द व्हॅली ऑफ डेथ, रोड सिक्स हण्ड्रेड.’ बाकी कुणाला नाही, तरी जवानांना आज्ञेचं पालन हे करावंच लागतं. कुठल्याही सबबी, कारणं तो सांगू शकत नाही. म्हणून बाबुलसिंग निघाला. घरात फक्त वृद्ध आइ-वडील. त्यात वडील आजारी. म्हणून त्याने दोघांना टेम्पो ट्रॅक्समध्ये भरलं. त्याचा प्लॅन असा होता की, भुसावळमधल्या एका हॉस्पिटलमध्ये आई-वडिलांना रवाना करायचं आणि भुसावळमधून जी कुठली पुढची ट्रेन मिळेल त्याने डय़ुटीवर हजर व्हायचं. पण भुसावळच्या बाहेरच वर्दीतल्या सहा पोलिसांनी बाबुलसिंगला पकडलं आणि म्हणाले, ही ट्रॅक्स प्रवासी वाहतुकीची नाही त्यामुळे तुला दंड भरायला लागणार. बाबुलसिंग म्हणाला, ‘ठीक आहे, मी दंड भरायला तयार आहे. पण मला जाऊ द्या! कारण मी सीमेवर लढण्यासाठी निघालो आहे. हे माझं इंडियन आर्मीचं वॉरंट.’ म्हणजे याचा अर्थ काय, हे त्या निर्बुद्धांच्या लक्षात आलं नव्हतं. कारण त्याही परिस्थितीत त्यांना फक्त दंड नको होता. म्हणून बाबुलसिंग संतापला आणि त्याने त्यातल्या एका पोलिसाची गचांडी पकडली. वर्दीतल्या आणि डय़ूटीवर असलेल्या पोलिसाची गचांडी पडकली म्हणजे इंडियन पिनल कोड सेक्शन तीनशे त्रेपन्नखाली हा अपराध झाला. आणि डय़ूटी काय, तर सीमेवर लढायला निघालेल्या जवानाकडून पैसे खाणे. म्हणून मग बाबुलसिंगला अटक झाली आणि ती रात्र त्याने पोलीस कोठडीत काढली. दुसऱ्या दिवशी त्याला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं. मॅजिस्ट्रेट शहाणा माणूस असला पाहिजे. मॅजिस्ट्रेटने त्याला सोडून दिलं. पण बाबुलसिंग रजपूत घरी गेला आणि त्याने विष खाऊन आत्महत्या केली. पाकिस्तानच्या गोळ्यांचा जो बेदरकारपणे सामना करू शकत होता, त्याचा पराभव आमच्याच देशातल्या भ्रष्टाचाराने केला. भ्रष्टाचार हा कॅन्सरसारखा पसरलाय या देशात. आणि जेव्हा नवीन विचारांचं राष्ट्र जन्माला येईल तेव्हाच तो संपेल. चांगले दिवस येतील म्हणून उगाच मोठमोठय़ा जाहिराती करून काही होणार नाही. जोपर्यंत चांगला विचार अमलात येऊन त्याचे परिणाम दिसायला लागणार नाहीत तोपर्यंत ‘चांगले दिवस’ हे एक गोंडस स्वप्नच राहणार.’

आजूबाजूला चांगलंच उजाडलं होतं. बऱ्यापैकी प्रकाश पसरला होता. आजूबाजूला आणि डोक्यातही. त्या क्षणी धन्याच्या कुठल्याही प्रश्नाचं किंवा समस्यांचं उत्तर आमच्यापैकी कुणाकडेही नव्हतं. तरीही हा देश सोडून धन्याने जाऊ नये असंच आम्हाला वाटत होतं. आपण आपल्या देशाला ‘भारतमाता’ म्हणतो. आज या मातेला धन्यासारख्या विज्ञान सुपुत्रांची गरज आहे. धन्याची अस्वस्थता अगदीच समजण्यासारखी होती. पण मूठभर निरक्षर आणि बेअक्कल लोकांमुळे काही संपूर्ण देश वाईट होत नाही. काही ठोस उपाययोजनांची गरज होती. पण आज ना उद्या हे बदलेल अशी प्रत्येकाच्या मनात आशा होती. कदाचित धन्या म्हणतो त्याप्रमाणे ती भाबडी असण्याचीसुद्धा शक्यता होती. आज डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अभय बंग, विश्वास नांगरे पाटील यांसारखी माणसं स्वत:च्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग करून याच जमिनीवर राहून लोकांना मार्गदर्शक ठरेल असं काम करतच आहे की! पण सगळ्यांचे सगळे उपाय थकले. तरीही काहीतरी चमत्कार होईल आणि धन्या आपलं मत बदलेल असं आम्हाला शेवटपर्यंत वाटत होतं. पण नाही. एक दिवस धनंजय पाठक ऊर्फ आमचा धन्या xxx हा देश सोडून निघून गेला. कोणाला काहीही न कळवता, कुणाचाही निरोप न घेता. गुपचूप. (उत्तरार्ध)

निखिल रत्नपारखी nratna1212@gmail.com