तुम्हाला तुमच्या अवतीभवती अशी बरीच ज्येष्ठ वयाची मंडळी भेटतील, जी मागची अनेक वर्षे आयुष्यभर शरीराने सडपातळ होती, मात्र आता उतारवयामध्ये त्यांच्या शरीराने बाळसे धरले आहे. असे ज्येष्ठ नागरिक जर तुमच्या पाहाण्यात असतील तर त्यांना लगेच सावध करा, की हे योग्य नाही. तुम्हांला वाटेल की, “उतारवयात का होईना, त्यांचे शरीर जरा गुटगुटीत दिसत आहे, तर बिघडले कुठे?” तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की प्रौढ शरीराला उशिरा वयात आलेले हे बाळसे हे आरोग्याचे नाही तर अनारोग्याचे लक्षण आहे. हे सौष्ठव नाही तर अंगावर जमलेल्या चरबीचे थर आहेत. काय शरीराचे हे वाढलेले वजन व्यायाम करुन मिळवले आहे? काय शरीरावरील स्नायुंचा आकार वाढला आहे? काय हे शरीर स्नायुबद्ध झाले आहे? एखाददुसरा अपवाद सोडता नाहीच. मग केवळ शरीरावर चरबीचे थर वाढल्याने शरीर आकर्षक दिसत असेल तर पाहाणार्‍यांच्या म्हणजे आपल्या नजरेत दोष आहे. मुळात शरीर सडपातळ असावे, चपळ असावे तर ते निरोगी असे आपले निरोगी शरीराचे गणित नाही आहे. स्थूल शरीर दिसले, त्याहुनही पोट मोठे दिसले म्हणजे आपण त्या शरीराला निरोगी म्हणतो. त्यामुळेच की काय कृश शरीराचे ज्येष्ठ नागरिक उतार वयात का होईना, जाड दिसू लागले की त्यांना व त्यांच्या घरच्यांना कोण आनंद होतो. पण हा आनंद व्यर्थ आहे, हे ध्यानात घ्या.

प्रौढ वयात वजन वाढण्याची कारणे अनेक असली तरी त्यातले महत्त्वाचे कारण म्हणजे ‘मंदावलेला चयापचय’. चयापचय म्हणजे मेटाबोलिसम. आपण सेवन केलेल्या आहारापासून उर्जा तयार करण्याच्या क्रियेला मेटाबोलिसम म्हणतात. अन्न सेवन केल्यापासूनचे पचनाचे विविध टप्पे, त्या अन्नकणांपासून शरीराला आवश्यक अशा उर्जेची निर्मिती ही अनेक जैवरासायनिक प्रक्रियांची लांबच लांब साखळी आहे. प्रत्येक शरीरामध्ये या चयापचयाचा एक निश्चीत असा वेग असतो, जो त्या-त्या शरीराच्या उर्जेच्या गरजांवर निर्भर असतो. उर्जेची गरज ही त्या-त्या शरीराच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. जसे एखादी व्यक्ती खूप धावपळ करणारी, सतत कामकाजामध्ये व्यग्र असणारी, नियमित व्यायाम करणारी अशी असेल तर साहजिकच त्या शरीराचा चयापचय क्रियाशील व तुलनेने वेगवान असतो. याऊलट जो माणूस एकाच जागेवर बसून राहाणारा, फारशी धावपळ न करणारा, ज्याच्या शरीराला परिश्रम-व्यायाम घडतच नाहीत असा असेल तर त्या माणसाचा चयापचय कमी क्रियाशील व तुलनेने कमी वेगवान असतो. ज्याचा चयापचय वेगवान असतो, ती व्यक्ती सहसा सडपातळ शरीराची असते, तर मंद चयापचय असणार्‍या माणसाचे शरीर हे सहसा स्थूल असते.

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

आयुष्यभर सडपातळ असणार्‍या व्यक्ती उतार वयामध्ये स्थूल शरीराच्या व तुंदिलतनू दिसण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चयापचयाचा वेग मंदावणे. चयापचयाचा वेग मंदावल्याने आतड्यांची पुरःसरण गतीसुद्धा मंदावते व अन्न आतड्यांमधून मंद वेगाने पुढे सरकते. अशावेळी पोटात अन्न अधिक काळ राहिल्याने पोट जड होणे, गुबारा धरणे, मलावरोध वगैरे तक्रारी त्रास देतात. त्याचबरोबर अन्न अधिक काळ आतड्यांमध्ये राहिल्याने अन्नरसाच्या शोषणास अधिक काळ मिळतो आणि शरीराचे पोषण वाढते. अधिक प्रमाणात मिळणार्‍या या पोषणाला व्यायामाची व परिश्रमाची जोड तर उतारवयामध्ये सहसा नसतेच. जीवनशैलीसुद्धा फारशी धावपळीची नसल्याने शरीराला एकंदरच उर्जेची फारशी गरज भासत नाही. मग काय करायचे त्या अधिकच्या उर्जेचे-अधिकच्या पोषणाचे? ती उर्जा चरबीच्या स्वरुपात साठवून ठेवली जाते व ते शरीर गुटगुटीत दिसू लागते, जे अर्थातच आरोग्याला घातक असते. वास्तवात वर दिलेली कारणे ज्येष्ठांनाच नव्हे तर २१व्या शतकातल्या सर्वांनाच लागू होतात. उतार वयामध्ये शरीराचे वजन वाढणे म्हणजे एक नव्हे अनेक आजारांना आमंत्रण, हे लक्षात घ्या व त्यांना शरीर सडपातळ ठेवण्यास प्रवृत्त करा.