लहान मुलं एकटी असताना स्वत:शी आणि आपल्या खेळण्यांशीही अगदी दुसऱ्या एखाद्या जिवंत व्यक्तीशी बोलल्यासारखं बोलतात. काही मुलं आपल्या खेळात मनानेच एखादा काल्पनिक मित्र निर्माण करून त्याच्याशीही बोलतात. मुलांचं हे काल्पनिक विश्व पालकांना काळजी करण्यासारखं नक्कीच नाही. पण जेव्हा मुलं तासन्तास अशा काल्पनिक पात्रांशी खेळू लागतात तेव्हा थोडी काळजी वाटणं साहजिक आहे.. माझा मुलगा समीर पाच वर्षांचा आहे. बालवाडीत जातो. पण आमच्या सोसायटीत त्याला खेळायला त्याच्या वयाची मुलं नाहीत. तसे दिवसभर माझे सासू-सासरे घरी असतात आणि ते समीरला छान सांभाळतात. पण परवा सासूबाई सांगत होत्या, की अलीकडे समीर घरी एकटा खेळतो, तेव्हा तो कुणाशी तरी सारखं बोलत असतो. म्हणजे खरं तर स्वत:शीच बोलत असतो. पण कुठल्यातरी मित्राशी बोलल्याचा त्याचा आविर्भाव असतो. सासूबाईंच्या सांगण्यानंतर मी स्वत: पण बघितलं त्याला असं तासन्तास ‘अदृश्य’ मित्राशी खेळताना. हे कितपत योग्य आहे? लहान मुलं काल्पनिक पात्रांशी बोलतात, खेळतात हे मीपण समजू शकते. पण याचा संबंध कोणत्या मानसिक त्रासाशी तर नसेल ना? उत्तर- समीरच्या वागण्यानं तुमचा अगदी जीव उडून गेलाय, हे दिसतंय मला. त्यातून, मुलं स्वत:शी बोलतात, खेळताना काल्पनिक पात्रांशी बोलतात, हे तुम्हाला माहीत असल्यानं तुमची तक्रार सहजपणे दूर सारण्यासारखी नाही, हे पण मी लक्षात घेतलंय. शिवाय सासू-सासरे समीरला अगदी छान सांभाळतात, हे तुम्हीच म्हणत असल्यानं तुमच्यातल्या मतभेदांमुळे, किंवा भावनिक केमिस्ट्री जुळत नसल्याचा त्याच्यावर काही परिणाम होत असावा, असं वरकरणी तरी म्हणता येत नाहीये. आजूबाजूला समवयस्क मुलं नसल्याचा तर हा परिणाम नसेल, असं जे तुम्ही सुचवताय, तेही विचारात घेतलं पाहिजे. पण अशी सगळी मुलं थोडंच इतके तास काल्पनिक मित्र घेतात? त्यामुळे तुम्ही ‘फॉल्स अलार्म’ तर नक्कीच देत नसावा, असं माझं मत झालंय. पण तो बालवाडीत जातो, हे खूप महत्त्वाचं आहे. प्रौढ माणसांमध्ये जसं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करताना घरातल्या प्रेमाच्या माणसांबरोबरचं वागणं, कामावरचं वागणं अन् मित्रांमधलं विरंगुळ्याच्या वेळातलं वागणं अभ्यासायला लागतं, तसंच लहान मुलांसाठी त्यांच्याही आयुष्यातले हे इतर पलू लक्षात घ्यायला हवेत. म्हणजे काल्पनिक पात्रांशी बोलणं हे जरी गुणात्मक दृष्टीने फार ‘अबनॉर्मल’ नसलं, तरी सर्व वेळ तेच करीत राहणं, हे दुखण्याची सुरुवात नाही ना, हे बघायला हवं. शाळेतले त्याचे मित्र त्याच्याशी कसे वागतात, हे पाहायला हवं. पाच वर्षांपर्यंत जरी अर्थपूर्ण संवाद न करता, मुलं स्वत:ला हवं तेच बोलत राहात असली (कलेक्टिव्ह मोनोलॉग), तरी ती दुसऱ्याचं अस्तित्व मान्य करताना दिसतात. त्याच्या खेळण्या-बोलण्यावर थोडं लक्ष ठेवलं किंवा त्यांची व्हिडीओ क्लिप काढून आणलीत, तर आपण त्याचा अभ्यास करू शकू. शिवाय बालवाडीतल्या ताई या खूप महत्त्वाची माहिती देऊ शकतील. त्याचं अभ्यासात लक्ष लागतं का? खेळात? तो आपली पाळी येईपर्यंत थांबू शकतो का? निर्जीव वस्तूंपेक्षा मित्र-मत्रिणी अन् इतर नात्यांना तो महत्त्व देऊ शकतो का? त्याच्या भाषेवर काही परिणाम झालाय का? तो सर्वनामे जास्त किंवा चुकीची वापरतो का? एकच एक गोष्ट तासन्तास करत बसतो का? स्वत:तच मश्गूल राहण्याकडे त्याचा कल आहे का? किंवा स्वभावात बदल होतोय का? मग त्याच्या बोलण्यातले विषय कुठले असतात? त्याच्या कल्पना काय असतात? हे तपशील महत्त्वाचे आहेत. तो इतरांपेक्षा बुद्धीनं खूप पुढे असेल, इतर जणांचे विषय त्याला खूप सामान्य (?) वाटत असले, तर तो जास्त काल्पनिक मित्र घेतो का? तो जास्त ‘क्रिएटिव्ह’ आहे का? तर मग त्याला अधिक बुद्धी चालवायला मिळेल, असं पहायची जबाबदारी तुमची, आमची अन् शाळेची पण आहे. म्हणून काहीही असलं तरी त्याला तज्ज्ञ माणसांनी बघावं, असं मला वाटतं. नियमितपणे भेटू या आपण जरा शाळेतल्या शिक्षकांना, इतर मित्रांना, त्यांच्या कुटुंबीयांना, अन् मानसशास्त्रातील तज्ज्ञांना. बऱ्याच वेळा मुलांचे प्रश्न हे ‘पासिंग फेज’चे निदर्शक असतात, ही जमेची बाजू. पण लक्ष ठेवणं आपलं काम आहे, अन् ते आपण नीट करू या. डॉ. वासुदेव परळीकर- paralikarv2010@gmail.com