मधुमेह म्हटलं की डोळ्यासमोर रक्तातली साखर उभी राहते. परंतु मधुमेह केवळ साखरेचा आजार नाही. इतर अनेक प्रश्नांची मालिका मधुमेहाची सोबत करते. दुर्दैवानं आपल्यातल्या अनेकांना याची कल्पना नसते. त्यामुळे आपण फक्त साखर एके साखर एवढेच लक्षात घेतो आणि सरतेशेवटी स्वतचे नुकसान करून घेतो. अर्थात हे गौडबंगाल नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला मधुमेहाबद्दल थोडी मुलभूत माहिती करून घेणं आवश्यक आहे.
या आजारात रक्तातली साखर वाढते हे बरोबर पण त्यामागची कारणं मात्र वेगवेगळी असतात. मधुमेहाचं वर्गीकरण करायचं झाल्यास त्याचे चार मुख्य गट पडतात. पहिला गट ‘टाइप वन मधुमेह’ म्हणून ओळखला जातो. यात पेशंटच्या शरीरातल्या इंश्युलीन बनवणारया पेशी नष्ट होतात त्यामुळे रुग्णाला इंश्युलीन घेण्यावाचून पर्याय नसतो. सुदैवाने भारतात याचं प्रमाण अत्यल्प म्हणजे जेमतेम एखादा टक्का आहे. इतर तीन प्रकारांपकी दोघांबाबतदेखील असंच म्हणता येईल. गरोदरपणातला मधुमेह आणि इतर कुठल्या तरी वेगळ्या मूळ आजाराचा परिणाम म्हणून होणारा सेकंडरी मधुमेह या दोन्ही प्रकारांचं प्रमाण फारसं नाही. राहता राहिला चौथा, सगळ्यात महत्वाचा ‘टाइप टू मधुमेह.’ भारतात ९८ टक्के लोकांना हा मधुमेह असतो. अनेक वर्ष शरीरात रासायनिक गोंधळ झाला की हा मधुमेह होतो. थोडक्यात सांगायचं तर हा मधुमेह प्राथमिक नसतो तर बऱ्याच रासायनिक घडामोडीमध्ये झालेल्या समस्यांचा एक भाग असतो. वैद्यकीय भाषेत याला ‘मेटाबोलिक सिण्ड्रोम’ म्हणतात. त्यामुळेच या मधुमेहावर केलेल्या उपचारांचा सर्वाधिक लाभ मिळवायचा असेल तर नुसत्या रक्तातल्या साखरेकडे लक्ष पुरवून चालत नाही, इतर अनेक प्रश्नांच भान ठेवावं लागतं. अन्यथा साखर नीट राहील पण तरीही शरीराचं अन्य कारणाने नुकसान होतंच राहील.   
मधुमेहासोबतचे विकार
* मधुमेहाच्या उपचारांमध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवण्याला खूपच महत्व आहे. मूत्रिपड निकामी करण्यात आणि हृदयावर परिणाम करण्यात याचा सिंहाचा वाट असतो. म्हणूनच रक्तदाब योग्य प्रमाणातच हवा. मधुमेह नसलेल्या रक्तदाबाच्या रुग्णापेक्षा मधुमेह असलेल्यांचा रक्तदाब थोडा कमीच ठेवण्याची गरज असते.
* कोलेस्टेरॉलकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यात चांगलं आणि वाईट असे दोन गट येतात. सगळ्यात खतरनाक म्हणजे एच.डी.एल. हृदयविकारामागे याचेच उपद्व्याप असतात. त्यामुळे हे कोलेस्टेरॉल नियंत्रणात हवं. हे किती आहे हे कळण्यासाठी आपल्याला लिपीड प्रोफाइल करून घ्यावं लागतं. नुसतं टोटल कोलेस्टेरॉल तपासून ते किती हे कळणार नाही. लिपीड प्रोफाइल करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात रक्तातलं ट्रायग्लिसराइडचं आणि एच.डी.एल. कोलेस्टेरॉलचं प्रमाणही कळतं. उपचारांनी चांगलं कोलेस्टेरॉल वाढवायला आणि ट्रायग्लिसराइड कमी करायला त्याचा फायदा होतो. ट्रायग्लिसराइड जर ५००च्या वर गेले तर स्वादुिपड खराब होऊ शकत. हा इतका गंभीर आजार असतो की अनेकदा रुग्णाचा जीवही जाऊ शकतो.
* मधुमेहात वजन कमी ठेवण्याला खूप महत्व असतं. त्यातही पोटाचा आकार कमी हवा. कारण मधुमेहात पोटाच्या पोकळीतली चरबी फार वाईट. ही चरबी म्हणजे केवळ शरीराला जास्त झालेलं अन्न चरबीच्या रूपात साठवण्याचा प्रकार नाही. ही पोटातली चरबी वेगवेगळे हार्मोन्स तयार करते आणि त्यातून रक्तवाहिन्याचं नुकसान करणारे पदार्थ निर्माण होतात. रक्तवाहिन्यांच्या आतलं आवरण खडबडीत करणाऱ्या या पदार्थामुळे रक्तवाहिन्यांत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हृद्यविकाराचा झटका किवा लकवा होऊ शकतो.
* मधुमेहात शरीरातली काही इंद्रियेसुद्धा सांभाळावी लागतात. यकृतामध्ये चरबी साठून होणारा ‘फॅट्टी लिव्हर’सारखा आजार होऊ शकतो. त्यावर नजर ठेवावी लागते. नाहीतर त्याचा यकृतावर दुष्परिणाम होतो. डोळे, मूत्रिपड, मज्जासंस्था हे मधुमेहाचे ठरलेले दावेदार. मधुमेह नियंत्रणात ठेवला नाही तर ही इंद्रिये कधी ना कधी खराब होणारच. त्यासाठी नियमित तपासण्या हव्यात. पाय किंवा पायाचा भाग कापला जाणे हेदेखिल मोठय़ा प्रमाणात दिसतं. विशेषत: पायांचा रक्तपुरवठा कमी झाला किंवा संवेदना संपल्या तर ही समस्या उद्भवते. मग रोज पायाकडे लक्ष देण आलं. कुठ काही लागलंय का, जखम झालीय का, पायाच्या एखाद्या भागात चामडी जाडी झालीय का ते रोजच्या रोज, प्रसंगी तळपायाखाली आरसा धरून पाहायला हवं.
* या प्रमुख शत्रुंसोबत आणखीही काही छुपे शत्रू आहेत. आतय़ांची आकुंचन-प्रसरणाची क्रिया थोडी थंडावते. त्याने वारंवार पोटफुगी होते. शौचाला साफ होत नाही. थायरॉईड ग्रंथीचा स्त्राव कमी-जास्त होण्याचं प्रमाण मधुमेहात जास्त असतं. युरीक अ‍ॅसिड अधिक आणि ‘ड’ जीवनसत्व कमी असण्याची शक्यता बळावते. पुरुषांमध्ये लंगिक हार्मोन्स कमी होऊ शकतात. त्यामुळे खांदेदुखी, पायाची जळजळ, त्वचा, लघवीची जागा, कान-नाक अशा ठिकाणी संसर्ग होण्याची शक्यता बळावते.
’ही यादी न संपणारी आहे कारण मुळात रक्त शरीराच्या प्रत्येक भागात जात असतं. त्यामुळे मधुमेहात रक्तात वाढलेल्या साखरेचा दुष्परिणाम शरीराच्या कुठल्याही हिश्श्यावर होऊ शकतो. प्रत्येक मधुमेही माणसाने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि केवळ साखरेवर नजर ठेवण्यापेक्षा शरीरात चाललेल्या संपूर्ण रासायनिक गोंधळाकडे लक्ष दिलं पाहिजे, तरच उपचारांचा व्यवस्थित फायदा होईल.