आपल्याकडे सूर्यप्रकाश भरपूर आहे म्हणून त्याचे काही अप्रूप वाटत नाही, पण पाश्चिमात्य देशात मात्र लोकांना सूर्यप्रकाशाचे महत्त्व पटले आहे. म्हणूनच तिकडे ‘सनबाथ’ वगैरे घेण्याची प्रथा आहे. त्वचेला सूर्यप्रकाश मिळाला तर रक्तदाब कमी होतो. हृदयविकाराचा धोका कमी होतो. आयुष्यकालही वाढतो, असा दावा नव्या संशोधनात करण्यात आला आहे. एडिंबर्ग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, आपल्या त्वचेवर सूर्यप्रकाश पडल्यास, रक्त वाहिन्यात एक संयुग सोडले जाते, त्यामुळे रक्तदाब कमी होतो.अतिसूर्यप्रकाशात राहिल्याने त्वचेचा कर्करोग होण्याची भीती असते, पण माफक प्रमाणात सूर्यप्रकाशाला सामोरे जाणे खूपच फायद्याचे आहे. सूर्यप्रकाशामुळे त्वचेखाली ‘ड’ जीवनसत्त्व तयार होते, त्याचबरोबर रक्तवाहिन्यात नायट्रिक ऑक्साईड हे संयुग सोडले जाते. एडिंबर्ग विद्यापीठातील त्वचा विज्ञान विभागाचे प्रा. रिचर्ड वेलर यांच्या मते सूर्यप्रकाशामुळे त्वचेच्या कर्करोगाची भीती थोडय़ा प्रमाणात असली तरी त्याचे फायदे त्यापेक्षा जास्त आहेत. औषधातून ‘ड’ जीवनसत्त्व पूरक स्वरूपात घेतल्याने पूर्ण फायदा मिळत नाही. त्यासाठी सूर्यप्रकाशाची जोड आवश्यक असते. सूर्यप्रकाशाने शरीराला इतक्या पातळ्यांवर फायदे होतात की त्यामुळे तुमचे आयुर्मानही वाढते. काही स्वयंसेवकांना अतिनील किरणांची मात्रा २० मिनिटे दिली असता त्यांचा रक्तदाब उतरलेला दिसून आला. ज्यांना नुसते ‘ड’ जीवनसत्त्व देण्यात आले त्यांच्यात रक्तदाब कमी झाला नाही.