मे महिना म्हणजे पर्यटनाचा महिना. आधीपासून आयोजन करून अनेक जण पर्यटनाचा आनंद लुटत असतील. हे पर्यटन सुरू असताना कधी कधी काही समस्या येण्याची शक्यता असते. पर्यटनस्थळाविषयी नीट माहिती मिळत नाही, दिशाभूल केली जाते, मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली फसवणूक होते, अचानक तब्येतीच्या काही गंभीर समस्या उद्भवतात, नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक समस्या येतात, मानवनिर्मित कारणांमुळेही अनेकदा कुठे तरी अडकायला होते, लुटले जाण्याच्या किंवा अन्य प्रकारच्या संकटांचाही सामना करावा लागण्याची शक्यता असते. अशा आणीबाणीच्या प्रसंगी मदतीचा हात देऊ करण्यासाठी केंद्र सरकारने हेल्पलाइन्स सुरू केल्या आहेत. या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – १८०० १११ ३६३, किंवा छोटा क्रमांक – १३६३. सर्व दिवशी २४ तास या हेल्पलाइन्स सुरू असतात. हिंदी व इंग्रजी या भाषांव्यतिरिक्त काही परदेशी भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. भारतीय पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटकांनाही या सुविधेचा लाभ घेता येतो. या हेल्पलाइन्सवर तक्रारीही नोंदवल्या जातात.
केंद्र सरकारची आणखी एक हेल्पलाइन आहे, इनक्रेडिबल इंडिया हेल्पलाइन अर्थात अतुल्य भारत हेल्पलाइन. तिचा दूरध्वनी क्रमांक आहे – ९९९९२३३२३३. संपूर्ण भारतातून या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येतो. वर उल्लेखलेल्या सर्व परिस्थितींमध्ये या हेल्पलाइनद्वारे मार्गदर्शन करणे, तक्रार नोंदवणे, मदत करणे आदी कामे केली जातात.
राज्य सरकारच्या पर्यटन खात्याचीही हेल्पलाइन आहे. तिचा दूरध्वनी क्रमांक आहे – १८०० २२९ ९३०. राज्यात आलेल्या बाहेरच्या पर्यटकांना, तसेच राज्यातल्या पर्यटकांना या क्रमांकावरून मदतीचा हात दिला जातो.
राज्य सरकारच्या पर्यटन खात्याच्या विभागाप्रमाणेही वेगवेगळ्या हेल्पलाइन्स आहेत. त्यांचे दूरध्वनी क्रमांक आहेत –

मुंबई विभाग – ०२२ २४२११६९०, ०२२ २४३००४१३.
पुणे विभाग – ०२० २६१२६८६७, ०२० २६१२८१६९.
रत्नागिरी विभाग – ०२३५२ २२३८४७, ०२३५२ २२१५०८.

नाशिक विभाग – ०२५३ २५७००५९.
नागपूर विभाग – ०७१२ २५३३३२५.
औरंगाबाद विभाग – ०२४० २३४३१६९.
अमरावती विभाग – ०७२१ २६६११६१२.

या साऱ्या हेल्पलाइन्स हाताशी असल्यावर पर्यटनाचा आनंद निश्चितच वाढेल.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com