मी आणि सचिन तेंडुलकरच्या खराब फॉर्मचा फटका मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर पडत आहे. आम्ही दोघेही सलामीवीर आम्हाला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत नाही. आयपीएल चषकावर नाव कोरायचे असल्यास, मी आणि सचिनला चांगली कामगिरी करावी लागेल, असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले.
‘‘गेल्या काही सामन्यांत केलेल्या खराब कामगिरीमुळे माझ्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आम्ही तिन्ही आघाडय़ांवर खराब खेळ केला. त्यामुळे खेळपट्टीला दोष देणे चुकीचे ठरेल. राजस्थानचे आव्हान पार करताना आम्हाला डावपेचानुसार फलंदाजी करण्यात अपयश आले. पुढील सामन्यांसाठी आम्ही फलंदाजी क्रमवारीत बदल करणार आहोत. त्यामुळे तळाच्या फलंदाजांना वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल,’’ असे संकेतही पॉन्टिंगने दिले.