तामिळनाडू शासनाने श्रीलंकेच्या खेळाडूंना आपल्या राज्यात खेळण्यास मनाई केल्यामुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील चेन्नईत होणारे बाद फेरीचे सामने दिल्लीत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी हा निर्णय जाहीर केला.
पहिला क्वालिफायर सामना २१ मे रोजी तर एलिमिनेटर सामना २२ मे रोजी चेन्नईत आयोजित केला जाणार होता. आता हे दोन्ही सामने नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर त्याच तारखांना होतील. हे सामने बंगळुरू व पुणे येथे आयोजित करण्याचाही प्रस्ताव होता, मात्र स्पर्धा संयोजन समितीने दिल्लीला प्राधान्य दिले. श्रीलंकेच्या खेळाडूंना तामिळनाडूत खेळण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती आयपीएल समितीने तामिळनाडू सरकारला केली होती. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे चेन्नईतील सामने दिल्लीत हलविण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या क्वालिफायर लढतीत साखळी गटातील पहिले दोन संघ एकमेकांशी खेळतील. या सामन्यातील विजयी संघ अंतिम लढतीकरिता पात्र होईल. साखळी गटातील तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांच्या संघांमध्ये २२ मे रोजी होणारी एलिमिनेटर लढत होईल. एलिमिनेटर लढतीतील विजयी संघ आणि पहिल्या क्वालिफायर सामन्यातील पराभूत संघ यांच्यामध्ये कोलकाता येथे २४ मे रोजी दुसरी क्वालिफायर लढत होईल. अंतिम सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर २६ मे रोजी होईल.