वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर मात केली. अखेरच्या षटाकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने दिल्लीवर विकेट्सने मात केली. मुंबईकडून कर्णधार रोहितने ४६ धावांची खेळी केली. रोहित आणि रायुडूने ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. 
युवराज सिंग म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातले गौरवशाली पर्व. ट्वेन्टी-२० विश्वचषकात सहा चेंडूत सहा षटकार ठोकणारा युवराज किंवा २०११ विश्वचषकात अष्टपैलू कामगिरीने संघाला विश्वविजेतेपद मिळवून देणारा युवराज.. अफलातून ऊर्जा, बिनधास्त खेळ याचं प्रतीक असणारा युवराजला कर्करोगाने ग्रासले. या दुर्धर आजाराला टक्कर देत युवराजने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र पूर्वीचा धडाकेबाज युवी पाहायला मिळत नसल्याची खंत त्याचे चाहते नेहमीच व्यक्त करतात. आठव्या हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या युवीला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. तरीही गॅरी कर्स्टन यांच्या संघव्यवस्थापनाने युवीवर विश्वास ठेवला आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लखलखणाऱ्या विजांच्या पाश्र्वभूमीवर गतवैभवी युवराजची  झलक चाहत्यांनी अनुभवली. युवराजच्या  अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने ६ बाद १५२ धावांचे आव्हान उभे केले.
युवराजने यंदाच्या हंगामातील दुसरी अर्धशतकी खेळी साकारताना ४४ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करीत ५७ धावा केल्या. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, परंतु मयांक अगरवाल याला लसिथ मलिंगाने भोपळाही फोडू दिला नाही. मग श्रेयस अय्यर (१९) आणि कप्तान जे पी डय़ुमिनी (२८) या दोघांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. श्रेयसला १० धावांवर असताना जीवदान मिळाले. हरभजन सिंगने त्याचा घरच्या मैदानावर फार काळ टिकाव लागू दिला नाही. युवराजने मग केदार जाधव (१६) आणि अँजेलो मॅथ्यूज (१२) सोबत छोटेखानी भागीदाऱ्या केल्या. त्यानंतर सौरभ तिवारी (नाबाद १३) सोबत सहाव्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. युवराजने मलिंगाच्या १७व्या षटकात तीन चौकार खेचले. तर मॅकलॅघनच्या १८व्या षटकात दोन षटकारांची अकादारी सादर करीत  अर्धशतकावर मोहर उमटवली. मलिंगाच्या १९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मात्र लेंडल सिमन्सने युवराजचा अप्रतिम झेल टिपला.  
त्यानंतर मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. लेंडल सिमन्स (०), पार्थिव पटेल (१३), हार्दिक पंडय़ा (५) आणि हरभजन सिंग (५) यांचे बळी मिळवत दिल्लीने ५.२ षटकात त्यांची ४ बाद ४० अशी अवस्था केली. परंतु विजांच्या कडकडाटांसह जोरदार मुसळधार पावसामुळे खेळ थांबवण्यात आला.