आयपीएलच्या ११ व्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. आयपीएलमधल्या बलाढय संघात गणना होणाऱ्या मुंबई इंडियन्सचे आव्हान प्लेऑफआधी साखळी फेरीतच संपुष्टात आले. मुंबईच्या या पराभवाचे विश्लेषण करताना खेळाडूंचे परफॉर्मन्स आणि अन्य वेगवेगळी कारणे समोर येत असली तरी सर्वात मोठी चूक लिलावाच्यावेळी झाली असेच म्हणावे लागेल.
जानेवारी महिन्यात आयपीएलचा लिलाव पार पडला त्यावेळी फ्रेंचायजींना काही खेळाडूंना रिटेन करण्याचा अधिकार होता. मुंबई इंडियन्सने त्या अधिकाराचा वापर करुन अंबाती रायुडू आणि जोस बटलर या दोन खेळाडूंना रिटेन केले असते तर कदाचित आज चित्र वेगळे दिसले असते.

अंबाती रायुडू आणि जोस बटलरने या मोसमात खोऱ्याने धावा केल्या असून आपल्या संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचवण्यात या दोघांनी मोलाचे योगदान दिले आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी रायडू दमदार कामगिरी करत असून त्याने १४ सामन्यात एका शतकासह ५८६ धावा केल्यात तर जोस बटलरने १३ सामन्यात ५४८ रन्स केलेत.

हे दोन्ही खेळाडू मागच्यावर्षी मुंबई इंडियन्समध्ये होते. पण यंदा लिलावाच्यावेळी संघमालक निता अंबानी यांनी या दोन्ही खेळाडूंना रिटेन करण्याचा अधिकार वापरला नाही. त्यांना तसा सल्ला दिला गेल्यामुळे कदाचित त्यांनी रायुडू आणि बटलर या दोघांना रिटेन करण्याचा अधिकार वापरला नसावा. पण हीच चूक आज मुंबईला महाग पडली असे खेदाने म्हणावे लागेल.

खेळाडूंची क्षमता ओळखण्यात माहिर असलेल्या महेंद्रसिंह धोनीने रायुडूला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि आज चित्र आपल्यासमोर आहे. हाच रायुडू मुंबईच्या संघात असताना मधल्याफळीत खेळायचा. तिथेही त्याने संघाच्या आवश्यकतेनुसार धावा करुन वेळोवेळी संघाच्या विजयात योगदान दिले होते.