कोलकात्याविरुद्ध सामन्यात अष्टपैलू खेळी करुन मुंबईच्या हार्दिर पांड्याने आपल्या संघाचं स्पर्धेतलं आव्हान कायम राखलं आहे. घरच्या मैदानावर कोलकात्याविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिकने फलंदाजी व गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत विजयात महत्वाचा वाटा उचलला. हार्दिकने २० चेंडूत ३५ धावांची नाबाद खेळी करत गोलंदाजीत २ महत्वाचे बळी घेत सर्वाधिक बळी पटकावणाऱ्यांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं.

अवश्य वाचा – रंगतदार सामन्यात पांड्या बंधू चमकले, मुंबईची कोलकात्यावर १३ धावांनी मात; स्पर्धेतलं आव्हान कायम

सामनावीराचा किताब स्विकारत असताना हार्दिक पांड्याला त्याच्या फलंदाजीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याला उत्तर देताना पांड्या म्हणाला, “मी कोणत्याही प्रकारे वेगळा सराव करत नाहीये. ज्यावेळी तुम्ही मैदानात उतरता तेव्हा एखादा दिवस हा तुमचा असतो, त्यामुळे फलंदाजीसाठी वेगळा सराव करणं मी थांबवलं आहे. सध्या मी अधिकाधीक सकारात्मक राहून चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो आहे. फलंदाजीदरम्यान तुम्ही खेचलेला एखादा षटकार तुम्हाला सामन्यात आत्मविश्वास देण्यासाठी पुरेसा असतो.” मुंबईने कोलकात्यावर १३ धावांनी मात करत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे.

प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मुंबईला उर्वरित सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे. सध्या मुंबईचा सकारात्मक असून उरलेल्या सर्व सामन्यांमध्ये संघ चांगली कामगिरी करेल अशी आशा हार्दिक पांड्याने व्यक्त केली आहे. याआधीच्या हंगामामध्येही मुंबईने अशी कामगिरी करुन दाखवलेली आहे, त्यामुळे यंदाच्या हंगामातही प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये प्रवेश मिळवण्याची मुंबईची आशा अद्याप कायम आहे.