सवाई मानसिंह स्टेडीयमवर राजस्थान रॉयल्सच्या कृष्णप्पा गौथमने ११ चेंडूत ३३ धावांची धडाकेबाज खेळी करुन, मुंबईच्या हातातला विजय हिसकावून घेतला. मुंबईने दिलेलं १६८ धावांचं आव्हान गौथमच्या खेळीमुळे राजस्थानने सहज पार करत, मुंबईवर ३ गडी राखून मात केली. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे आपल्या सहकाऱ्याच्या या खेळीवर चांगलाच खुश झालेला आहे.

अवश्य वाचा – IPL 2018 RR vs MI : गौथमच्या फटकेबाजीने राजस्थान विजयी

“सामन्याचा निकाल लागल्यानंतरही मला काहीवेळ विश्वास बसत नव्हता. १४ व्या षटकानंतर आमच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केल्यामुळे हा विजय मिळवणं शक्य झालं, नाहीतर मुंबईची धावसंख्या १८०-१९० च्या घरात गेली असती. मात्र गौथमने केलेली खेळी ही खरचं अविश्वसीनय होती. आमच्याकडे अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत माझं एक मन हा सामना आम्ही जिंकू असं मला सांगत होतं.” सामना संपल्यानंतर अजिंक्य रहाणेने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.

गोलंदाजीदरम्यान आपला पहिलाी सामना खेळणाऱ्या राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने मुंबईच्या मधल्या फळीला झटपट गुंडाळलं. त्यामुळे एका क्षणापर्यंत २०० पर्यंतची धावसंख्या गाठेल असा खेळी करणाऱ्या मुंबईला १६७ धावांवर समाधान मानावं लागलं. मंगळवारी मुंबई इंडियन्स सनराईजर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळणार आहे, त्यामुळे या सामन्यात मुंबईचा संघ विजय मिळवू शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.