आयपीएलच्या दहाव्या हंगामाचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची अकराव्या हंगामात फारशी चांगली सुरुवात झालेली नाहीये. आपल्या पहिल्या ३ सामन्यात मुंबईला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी चुकीचे फटके खेळल्यामुळे, चांगली सुरुवात होऊनही मुंबईला पराभव स्विकारावा लागत असल्याचं मत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – मुंबईचा अभिषेक नायर बनला कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक

“तिसऱ्या सामन्यात सुर्यकुमार यादवला सलामीला पाठवण्याचा निर्णय योग्य ठरला. यानंतर एविन लुईस आणि इशान किशन यांनीही चांगल्या धावा काढत मुंबईला मोठ्या धावसंख्येकडे नेलं. मात्र मधल्या फळीतले फलंदाज पुरते निराशा करत आहेत. हार्दिक आणि कृणाल पांड्या यांनी आपल्या फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. फिरकीपटू आणि जलदगती गोलंदाजांविरुद्ध खेळताना फटक्यांची निवड योग्य होणं गरजेचं आहे. तसं न झाल्यास आधीच्या फलंदाजांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरतं.” टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहीलेल्या स्तंभामध्ये गावसकर बोलत होते.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पहिल्या ३ सामन्यांमध्ये फलंदाजीत सूर सापडत नाहीये. तिनही सामन्यांमध्ये धावा करण्याची संधी चालून आलेली असताना रोहितने त्या संधीचा लाभ घेतला नाही. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये रोहितची बॅट चालणं हे मुंबईसाठी अत्यंत गरजेचं बनलं आहे.

अवश्य वाचा – मुंबईला आस पहिल्या विजयाची