अकराव्या हंगामात दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली आपला पहिला सामना खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर मात केली. बंगळुरुच्या संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, कोलकात्याकडून सुनील नरीन, नितीश राणा आणि कर्णधार दिनेश कार्तिकने आक्रमक खेळी करत आपल्या संघाचा विजय निश्चीत केला.

याआधी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने १७६ धावांपर्यंत मजल मारली. मात्र पहिल्याच सामन्यात विराट कोहलीच्या संघाला पराभवाचा सामना का करावा लागला याची काही प्रमुख कारणं आपण जाणून घेणार आहोत.
त ३१ धावा करु शकला.

५. फलंदाजीत विराट कोहलीला न गवसलेला सूर

२०१७ वर्षात आणि नुकत्याच पार पडलेल्या आफ्रिका दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीने केलेली फलंदाजी सर्वांना माहिती आहेच. मात्र आयपीएलचा आपला पहिला सामना खेळणारा विराट आपल्या नेहमीच्या लयीत दिसत नव्हता. कोलकात्याविरुद्ध सामन्यात खेळताना विराटला फिरकीपटू गोलंदाजांचा सामना करताना अडचण येत होती. यामुळे आपल्या पहिल्याच सामन्यात विराट ३३ चेंडू ३१ धावा करु शकला.

४. सुनील नरीनची फटकेबाजी

दहाव्या हंगामात सुनील नरीनने कोलकात्याकडून खेळताना फलंदाजीत सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. त्यादरम्यान सुनील नरीनची आक्रमक खेळी, आपण सर्वांनी अनुभवली आहे. दहाव्या हंगामात बंगळुरुच्या घरच्या मैदानावर खेळताना सुनील नरीनने १५ चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती.

कालच्या सामन्यातही सुनील नरीनने फटकेबाजी करत कोलकात्याच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बंगळुरुच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत नरीनने आपलं अर्धशतक साजरं केलं. या फटकेबाजीमुळे बंगळुरु सामन्यात पिछाडीवर गेला.

३. बंगळुरुच्या फिरकीपटूंची निराशाजनक कामगिरी

गोलंदाजीत बंगळुरुचा संघ वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल यांच्या कामगिरीवर अवलंबुन आहे. मात्र या दोन्ही गोलंदाजांना कालच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. वॉशिंग्टन सुंदरला नरीनच्या फटकेबाजीचा शिकार व्हावं लागलं. आपल्या दुसऱ्या षटकात सुंदरने तब्बल १९ धावा दिल्या. याच षटकानंतर सामन्याचं पारड कोलकात्याच्या बाजूने झुकलं. चहलही कालच्या सामन्यात गोलंदाजीदरम्यान चाचपडताना दिसला.

२. दिनेश कार्तिक – नितीश राणाची अभेद्य भागिदारी

आठव्या षटकात रॉबिन उथप्पा माघारी परतल्यानंतर दिनेश कार्तिक आणि नितीश राणा जोडीने कोलकात्याच्या डावाची सुत्र आपल्या हाती घेतली. विजयासाठी १०० धावांची गरज असताना कार्तिक-राणा जोडीने ५५ धावांची भागीदारी करत आपल्या संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं.

१. नितीश राणाचा गोलंदाजीत ड्रीम स्पेल

नितीश राणाला कालच्या सामन्यात गोलंदाजी देण्याचा कर्णधार दिनेश कार्तिकचा निर्णय योग्य ठरला. एकाच षटकात एबी डिव्हीलियर्स आणि विराट कोहलीला माघारी धाडतं राणाने बंगळुरुच्या फलंदाजीचा कणाच मोडला.