एखाद्या फलंदाजाला बाद करणे हे गोलंदाजांचे स्वप्न असते. त्यातही त्याला फलंदाजाला त्रिफळाचित केल्यावर गोलंदाजाला गगन ठेंगणे होते. आणि स्वतःचाच अभिमान वाटतो. तो टिपलेला बळी त्या गोलंदाजासाठी खास असतो. अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खाननेही अशाच एका गोष्टीबाबत नुकताच खुलासा केला.

यंदाच्या आयपीएलमध्ये रशीद खान याने आपल्या फिरकीची जादू सर्वदूर पोहोचवली. रशीदने त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर काही सामन्यांत हैदराबादला विजय मिळवून दिला. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण २१ बळी टिपले. पण त्यापैकी काही विशिष्ट व्यक्तींना बाद करण्याचा आनंद त्याला अधिक झाला. रशीदने स्वतः याबद्दल सांगितले.

रशीद म्हणाला की मी या हंगामात २१ गडी बाद केले. पण एबी डिव्हिलियर्स, महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली यांना बाद करणे हे माझ्यासाठी विशेष होते. हे तिघेही फिरकी गोलंदाजी उत्तम प्रकारे खेळतात. त्यामुळे त्यांना बाद करणे हे माझ्यासाठी खास होते. ते माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम तीन बळी आहेत.

रशीद खानने बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात एबी डिव्हिलियर्स याला केवळ ५ धावांवर केले. त्याच सामन्यात त्याने विराट कोहलीला गुगली चेंडू टाकून त्रिफळाचित केले. तर प्ले ऑफच्या पहिल्या सामन्यात त्याने धोनीलाही गुगली चेंडू टाकून त्रिफळाचित केले. हे तीन मातब्बर खेळाडू रशीदने त्रिफळाचित केले. त्यामुळे या तीन विकेट्स त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम बळी असल्याचे तो म्हणाला.