चिन्नास्वामी स्टेडियमवर काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव झाल्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा निराश झाला आहे. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या गटात खेळण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर आरसीबीने मुंबईला १४ धावांनी पराभूत केले. आठ सामन्यात मुंबईच्या खात्यात फक्त चार गुण असून गुणतालिकेत मुंबईचा संघ सातव्या स्थानावर आहे.

यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सने अत्यंत सुमार कामगिरी केली आहे. मुंबईच्या या निराशाजनक प्रदर्शनाबद्दल बोलताना रोहित म्हणाला कि, पराभवामुळे दु:ख झाले आहे. आम्ही स्मार्ट क्रिकेट खेळू शकलो नाही. पराभवाला आम्हीच जबाबदार आहोत. पावरप्लेमध्ये विकेट गमावल्यामुळे जास्त अडचणीत आलो. विजयाचे श्रेय आरसीबीला जाते. त्यांनी उत्तम गोलंदाजी केली. ही कठिण विकेट होती आरसीबीच्या गोलंदाजीवर आम्ही फक्त तर्कवितर्क लढवत बसलो.

रोहितने अजूनही प्लेऑफमध्ये खेळण्याची आशा सोडलेली नाही. अपेक्षा सोडून चालणार नाही. सर्व सामने जिंकावे लागतील असे रोहितने म्हटले आहे. सुरुवातीला बॅटिंग करत बंगळुरुच्या संघाने मुंबईसमोर विजयासाठी १६८ धावांचे आव्हान केले होते. मात्र हे आव्हान मुंबईला पार करता आले नाही. मुंबईला १५३ धावाच करता आल्या.