मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. रोहित शर्माच्या मुंबई संघाने आतापर्यंत ४ वेळा स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे. २०१९ सालीही मुंबईचे अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जवर मात करत स्पर्धेत बाजी मारली. यंदा देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आयपीएलचं आयोजन युएईत करण्यात आलं आहे. यंदाच्या हंगामात कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. गतविजेता मुंबईचा संघही यंदा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जातो आहे.

जाणून घेऊयात काय आहेत ती कारणं…ज्यामुळे मुंबईला यंदाच्या हंगामाचं विजेतेपद मिळू शकतं.

१) अनुभवी आणि भेदक गोलंदाजी – मुंबई इंडियन्सचं ब्रम्हास्त्र मानला जाणारा लसिथ मलिंगाने यंदाच्या हंगामातून माघार घेतलेली आहे. मलिंगाच्या जागेवर मुंबईने जेम्स पॅटिन्सनला संघात स्थान दिलं आहे. तरीही संघात जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, मिचेल मॅक्लेनघन, नॅथन कुल्टर-नाईल, धवल कुलकर्णी अशा गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध आहे. आतापर्यंत मुंबईने ज्या-ज्या वेळी स्पर्धेची विजेतेपदं पटकावली आहेत त्यावेळी गोलंदाजांची कामगिरी ही वाखणण्याजोगी राहिलेली आहे. त्यामुळे यंदाही मुंबईचे गोलंदाज चमकल्यास ते संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकतात.

२) तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा मेळ – मुंबई इंडियन्स संघामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समन्वय आहे. संघात रोहित शर्मा, कायरन पॉलार्ड, ख्रिस लिन, क्विंटन डी कॉक, ट्रेंट बोल्ड असे काही अनुभवी खेळाडू आहेत. तर इशान किशन, हार्दिक पंड्या, सूर्य कुमार यादव, जसप्रीत बुमराह असे नवीन दमाचे खेळाडू देखील आहेत. त्यामुळे अनुभवी खेळाडूंचा अनुभव आणि युवा खेळाडूंचा उत्साह यामुळे हा संघ पुन्हा एकदा आयपीएलचा विजेता बनू शकेल.

अवश्य वाचा – IPL 2020 : मुंबई इंडियन्सची ‘Smart Ring’ करणार करोनाचा सामना

३) धडाकेबाज फलंदाजी – आक्रमक आणि धडाकेबाज फलंदाजी हा मुंबईचा नेहमी प्लस पॉईंट ठरलेला आहे. रोहित शर्मा, क्विंट डी-कॉक आणि ख्रिस लिन हे सलामीचे शिलेदार प्रतिस्पर्धी गोलंदाजावर हल्लाबोल करण्यात माहीर आहेत. याव्यतिरीक्त सूर्यकुमार यादव, इशान किशन यासारखे भारतीय फलंदाज तर कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या यांसारखे चौफेर फटकेबाजी करणारे शिलेदार मुंबईच्या ताफ्यात समाविष्ट आहेत. त्यामुळे या सर्व फलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केल्यास ते यंदाच्या हंगामात विजेतेपद मिळवू शकतात.

४) अष्टपैलू खेळाडू – कृणाल आणि हार्दिक पांड्या तसेच कायरन पोलार्ड यासारखे खेळाडू गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या संघाचा कणा मानले जातात. गरज असेल तिकडे फलंदाजी आणि गरज असेल तिकडे गोलंदाजाची भूमिका निभावत नेहमी या खेळाडूंनी आपलं महत्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे यंदा या खेळाडूंनी नेहमीसारखा खेळ केला तर मुंबईसाठी ती सकारात्मक बाब ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : ‘या’ दिवशी जाहीर होणार आयपीएलचं वेळापत्रक