आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं आव्हान संपुष्टात आलं. सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात केल्यानंतर चेन्नईची गाडी रुळावरुन घसरली ती परत कधी विजयपथावर आलीच नाही. प्रमुख खेळाडूंनी स्पर्धेआधी घेतलेली माघार, संघातील खेळाडूंना झालेली करोनाची लागण, अनुभवी खेळाडूंना दुखापतीने ग्रासणं, चुकीच्या खेळाडूंना वारंवार मिळत गेलेली संधी या सर्व गोष्टी चेन्नईला महागात पडल्या. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाची अशी अवस्था का झाली याचं कारण सांगितलं आहे.

अवश्य वाचा – IPL : CSK ने पुढच्या हंगामातही धोनीलाच कर्णधार ठेवलं तर आश्चर्य वाटायला नको – गौतम गंभीर

“माझ्या मते त्यांच्या संघात खूप वय झालेले खेळाडू आहेत. तुम्ही चेन्नईचा संघ पाहिलात तर त्यात तरुण खेळाडू कमी दिसतील. त्यांचे परदेशी खेळाडूही खूप वर्षांपासून खेळत आहेत आणि त्यांचही वय झालंय. त्यामुळे तरुणांऐवजी वय झालेल्या अनुभवी खेळाडूंवर यंदा विश्वास ठेवल्यामुळे चेन्नईची अशी अवस्था झाली आहे. हा हंगाम चेन्नईसाठी खरंच अविश्वसनीय होता. याआधीही ते पिछाडीवर पडायचे, परंतू यातून पुन्हा एकदा भरारी घेत जिंकणं त्यांना माहिती होतं. परंतू यंदा सगळंच उलटं होत गेलं.” Star Sports वाहिनीच्या Select Dougout कार्यक्रमात लारा बोलत होता.

अवश्य वाचा – IPL 2020 : एक हंगाम खराब गेल्यामुळे धोनी लगेच वाईट कर्णधार ठरत नाही – अंजुम चोप्रा

आतापर्यंत झालेल्या हंगामांमध्ये चेन्नईचा संघ नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असायचा. साखळी फेरीतून बाहेर पडण्याची चेन्नईची ही पहिलीच वेळ ठरली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीनेही यंदा निराशा केली. तेराव्या हंगामात चेन्नईचं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरीही आपले उर्वरित सामने जिंकत इतर संघांचं प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याचं स्वप्न संपवण्याचं काम चेन्नई सुपरकिंग्ज करु शकतं.