हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यंदाच्या हंगामात षटकारांच्या आतषबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या शारजाच्या मैदानावर मुंबईच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. डी कॉकचे अर्धशतक (६७) आणि इतर फलंदाजांच्या छोटेखानी स्फोटक खेळी यांच्या बळावर मुंबईने २० षटकात २०८ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात कृणाल पांड्याच्या फलंदाजीने चाहत्यांना खुश केलं.

वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल शेवटचं षटक टाकायला आला आणि त्याने दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याला बाद केलं. डावाचे चार चेंडू शिल्लक असताना मुंबई दोनशेपार मजल मारते की नाही अशी शंका चाहत्यांना होती, पण कृणाल पांड्याने चाहत्यांची शंका लगेच दूर केली. कृणालने पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि डावाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत मुंबईला २०८ धावांपर्यंत मजल मारून दिली. याचसोबत कमीत कमी १० धावा करणाऱ्या आणि ३ पेक्षा जास्त चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत IPLमध्ये ५००च्या स्ट्राईक रेटने धावा करणारा कृणाल पहिला खेळाडू ठरला.

प्रथम फलंदाजी करताना रोहित ६ धावांवर बाद झाला. रोहितनंतर सूर्यकुमार यादवने दमदार फटकेबाजी केली, पण तो फटकेबाजीच्या प्रयत्नात १८ चेंडूत ६ चौकारांसह २७ धावा करून माघारी परतला. गेले काही दिवस खराब कामगिरी करणाऱ्या क्विंटन डी कॉकने आज अर्धशतक ठोकलं. त्याने ६७ धावा (३९) केल्या. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार खेचले. त्याच्याशिवाय, इशान किशन (३१), हार्दिक पांड्या (२८), कायरन पोलार्ड (२५*) आणि कृणाल पांड्या (२०*) यांनी छोटेखानी खेळी करत मुंबईला २००पार पोहोचवले. सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्मा यांनी २-२ बळी टिपले.