हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यंदाच्या हंगामात षटकारांच्या आतषबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या शारजाच्या मैदानावर मुंबईच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. डी कॉकचे अर्धशतक (६७) आणि इतर फलंदाजांच्या छोटेखानी स्फोटक खेळी यांच्या बळावर मुंबईने २० षटकात २०८ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात मनीष पांडेने घेतलेला झेल खूपच चर्चेत राहिला.

इशान किशन दमदार फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत होता. १५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संदीप शर्माने त्याला पायाजवळ चेंडू टाकला. इशान किशनने चेंडू हवेत मारला. चेंडू चौकार जाणार असं वाटत असतानाच अचानक मनिष पांडेने सीमारेषेच्या नजीक झेल घेण्यासाठी झेप घेतली आणि अप्रतिम असा झेल टिपला.

प्रथम फलंदाजी करताना रोहित ६ धावांवर बाद झाला. रोहितनंतर सूर्यकुमार यादवने दमदार फटकेबाजी केली, पण तो फटकेबाजीच्या प्रयत्नात १८ चेंडूत ६ चौकारांसह २७ धावा करून माघारी परतला. गेले काही दिवस खराब कामगिरी करणाऱ्या क्विंटन डी कॉकने आज अर्धशतक ठोकलं. त्याने ६७ धावा (३९) केल्या. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार खेचले. त्याच्याशिवाय, इशान किशन (३१), हार्दिक पांड्या (२८), कायरन पोलार्ड (२५*) आणि कृणाल पांड्या (२०*) यांनी छोटेखानी खेळी करत मुंबईला २००पार पोहोचवले. सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्मा यांनी २-२ बळी टिपले.