रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सवर मात करत सलग दुसऱ्यांना विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत रोहित शर्माने आपल्या कर्णधारपदाला साजेसा खेळ करत अर्धशतकी खेळी केली. यंदाच्या हंगामात साखळी फेरीत रोहितला दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावं लागलं. फलंदाजीत नेहमीप्रमाणे धावा करता आल्या नसल्या तरीही मोक्याच्या क्षणी रोहितने आपला फॉर्म सिद्ध करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सामना संपल्यानंतर रोहितने संघाच्या विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. आपलं नेतृत्व हे हुकुमशहासारखं नाही हेच मुंबई इंडियन्सच्या यशामागचं महत्वाचं कारण असल्याचं रोहितला वाटतं. “हातात छडी घेऊन खेळाडूंच्या मागे लागणारा मी कर्णधार नाही. कर्णधार म्हणून मी फक्त त्यांना आत्मविश्वास देऊ शकतो. संघात समतोल राखणं गरजेचं असतं. यापेक्षा अधिक चांगल्या खेळाची आम्ही अपेक्षाही केली नव्हती. पहिल्या चेंडूपासून आम्ही आमचं काम चोख बजावलं होतं. माझ्यामते पडद्यामागे काम करणाऱ्या व्यक्तींचंही यात मोठं श्रेय आहे, अनेकदा त्यांना म्हणावं तितकं श्रेय मिळत नाही.”

अवश्य वाचा – भारताच्या टी-संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडेच जायला हवं – मायकल वॉन

रोहित शर्माने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. ५१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह त्याने ६८ धावा केल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला खरा…पण त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.