आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्ससमोर खडतर आव्हान निर्माण केलं आहे. पहिल्या प्ले-ऑफमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर दिल्लीने दुसऱ्या सामन्यात हैदराबादवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. गतविजेता मुंबईचा संघ यंदाच्या हंगामात चांगलाच फॉर्मात असला तरीही आयपीएलच्या इतिहासातला एक योगायोग यंदाच्या हंगामात जुळून आला तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ युएईत इतिहास घडवू शकतो.

हा योगायोग असा आहे की आयपीएलची सुरुवात झाल्यापासून दर ४ वर्षांनी नवीन संघाने स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे. २००८ साली स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर राजस्थानने बाजी मारली यानंतर २०१२ साली गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर मात करत पहिल्यांदा विजेतेपद पटकावलं. २०१६ डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाने विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे हाच योगायोग सुरु राहिला तर २०२० चा हंगाम दिल्लीच्या नावे जाण्याची शक्यता आहे.

हैदराबादविरुद्ध करो या मरो च्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांना सूर गवसला. स्टॉयनिसने सलामीला फलंदाजीसाठी येत शिखर धवनसोबत भागीदारी करत हैदराबादच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांना असाच सूर गवसले अशी आशा त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत.