हैदराबादच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत बंगळुरूचा डाव ७ बाद १२० धावांवर रोखला. संदीप शर्मा, जेसन होल्डर यांचा भेदक मारा आणि त्याला फिरकीपटूंची मिळालेली साथ याच्या बळावर हैदराबादने विराटसेनेला फटकेबाजीची संधीच दिली नाही. १२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मनिष पांडेदेखील संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला पण पुढच्या चेंडूवर तोच फटका मारताना वॉर्नर झेलबाद झाला.

१०व्या षटकात इसुरू उदाना गोलंदाजी करत होता. त्याच्या हातून सुटलेला चेंडू विल्यमसनच्या खांद्याच्या उंचीला आला. त्याने चेंडू मारलेला चेंडू नियमानुसार नो-बॉल असायला हवा होता असा दावा विल्यमसनने केला. समालोचकांनीदेखील नियमाचा आधार घेत हा चेंडू नो-बॉल असायला हवा असं म्हटलं. पण चेंडू नो-बॉल ठरवण्यात आला नाही. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा हैदराबादचा केवळ १ गडी बाद झालेला होता. तसेच त्यांना ६०पेक्षाही अधिक चेंडूमध्ये ५० धावांची आवश्यकता होती. हैदराबादचा संघ भक्कम स्थितीत असल्याने त्यांना पंचांच्या त्या निर्णयाचा फरक पडला नाही. याबद्दल वर्णन करताना हिंदी समालोचन कक्षातून आशिष नेहराने अतिशय मजेशीर टिपण्णी केली. “जर हा सामना अटीतटीच्या अवस्थेत असता आणि १-१ धाव महत्त्वाची असती तर कर्णधार वॉर्नरने पंचांच्या या निर्णयाविरोधात थेट सीमारेषेवर येत घोषणाबाजीच केली असती”, असं मजेशीर वक्तव्य नेहराने केलं.

दरम्यान, पहिल्या डावात बंगळुरूच्या संघाने १२० धावा केल्या. सलामीवीर जोशुआ फिलीप, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर आणि गुरकीरत हे चार फलंदाज वगळता इतरांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. संदीप शर्माने २० धावांत २ बळी टिपले.