सलामीच्या फळीतील फलंदाजांनी घोर निराशा केल्यानंतर मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या महत्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबईविरुद्ध अंतिम सामन्यात १५६ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार श्रेयसचं नाबाद अर्धशतक आणि त्याला ऋषभ पंतने दिलेली उत्तम साथ हे दिल्लीच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं.

३ बाद २२ अशी परिस्थिती असताना पंत आणि अय्यरने चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत माघारी परतल्यानंतरही श्रेयस अय्यरने शेवटपर्यंत मैदानावर तग धरत अर्धशतक झळकावलं. श्रेयसने ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. आयपीएलच्या अंतिम फेरीत अर्धशतक झळकावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत आता श्रेयस अय्यरचंही नाव घेतलं जाणार आहे.

मुंबईच्या गोलंदाजांनीही या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. ट्रेंट बोल्टने ३, कुल्टर-नाईलने २ तर जयंत यादवने एक बळी घेतला.