IPL 2020मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. इतिहासात पहिल्यांदाच IPLची अंतिम फेरी गाठणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघापुढे चार वेळा IPL विजेतेपद मिळालेल्या मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. यंदाच्या हंगामात मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३ सामने झाले असून त्यात तीनही वेळा मुंबईचा विजय झाला. आजच्या सामन्यात दिल्लीच्या संघाला या तीन पराभवांचा जम्बो बदला घेण्याची संधी आहे. पण याचदरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा भारतात परतलेला एक अनुभवी खेळाडू पुन्हा दुबईला रवाना झाला आहे.

दिल्लीच्या संघाला स्पर्धेच्या सुरूवातीला दुखापतीचं ग्रहण लागलं होतं. आधी रविचंद्रन अश्विन, मग इशांत शर्मा आणि अमित मिश्रा तर नंतर ऋषभ पंत… सारेच दुखापतीच्या तक्रारीने ग्रस्त होते. अश्विन आणि पंत यांनी दुखपातीतून सावरून पुनरागमन केलं. पण इशांत शर्मा आणि अमित मिश्रा यांना मात्र स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर आता अमित मिश्रा पुन्हा एकदा दुबईला रवाना झाल्याची माहिती त्याने ट्विट करून दिली आहे.

अमित मिश्रा सकाळी दिल्लीहून दुबईला रवाना झाला. “दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे मी त्यांना पाठिंबा द्यायला दुबईला जात आहे. मला आणि सर्व दिल्लीकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी दिल्लीच्या संघाने केली आहे. तुम्ही सारेजणदेखील दिल्लीला पाठिंबा आणि प्रेम द्या”, असं ट्विट अमित मिश्राने केलं आहे.