अबु धाबीच्या मैदानावर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने KKR वर ८ गडी राखून मात करत धडाकेबाज विजयाची नोंद केली आहे. विजयासाठी अवश्यक असलेल्या ८५ धावांचं आव्हान RCB च्या संघाने सहज पूर्ण केलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना KKR चा डाव RCB च्या माऱ्यासमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत KKR ची दाणादाण उडवली. RCB ने विजायासाठीचं आव्हान १४ व्या षटकात पूर्ण केलं. फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीवर KKR चा प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम चांगलाच नाराज झाला आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपली नाराजी बोलून दाखवली.

अवश्य वाचा – BLOG : दुखापती आणि चुकीचे निर्णय KKR ला महागात पडणार का??

“खरं सांगायला गेलं तर खेळपट्टी गोलंदाजांना फारशी मदत करणारी होती असं मला वाटलं नाही. सिराज आणि ख्रिस मॉरिस यांचं कौतुक आहेच, त्यांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये खूप चांगला मारा केला. परंतू आमचे फलंदाज खेळपट्टीवर एक-दोन विकेट गेल्यानंतर थोडेसे घाबरलेले दिसले. या गोष्टीमुळे मी खूप निराश झालो. सामन्याच्या सुरुवातीला चेंडू कोणत्या टप्प्यावर येईल आणि इतर सर्व गोष्टींची चर्चा आम्ही केली होती. फलंदाजांनी सकारात्मक राहून खेळणं गरजेचं होतं. यापुढील सामन्यांआधी आम्हाला या गोष्टीवर काम करावं लागणार आहे. आघाडीच्या फळीतल्या आमच्या एकाही फलंदाजाला चांगला खेळ करता आला नाही.”

८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना RCB च्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. फिंच आणि देवदत पडीकल यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागादारी केली. फलंदाजीत निराशाजनक कामगिरी केलेल्या KKR च्या संघाने गोलंदाजीतही फारशी चमक दाखवली नाही. मागच्या सामन्यात गोलंदाजीत चमक दाखवलेल्या लॉकी फर्ग्युसनला पॉवरप्ले नंतर गोलंदाजीची संधी दिली. फर्ग्युसनने संधी मिळताच फिंचला माघारी धाडत RCB ला पहिला धक्का दिला. देवदत पडीकलही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि गुरकिरत मान यांनी अधिक जोखीम न घेता पडझड होणार नाही याची काळजी घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : KKR च्या फलंदाजांचं घालिन लोटांगण, पॉवरप्लेमध्ये नोंदवली निच्चांकी धावसंख्या