आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात करुन करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जला दुसऱ्याच सामन्यात धक्का बसला आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नईवर १६ धावांनी मात करत पहिला विजय नोंदवला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या २१७ धावांचं पाठलाग करताना चेन्नईचा संघ २०० धावांपर्यंतच मजल मारु शकला. २१७ धावांचं आव्हान असताना धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणं पसंत केलं. ज्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. गौतम गंभीरनंतर विरेंद्र सेहवागनेही धोनीच्या कर्णधारपदाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवले आहेत. या सामन्यात धोनीने घेतलेले काही निर्णय चुकीचं असल्याचं मत विरेंद्र सेहवागने Cricbuzz शी बोलताना व्यक्त केले आहेत. यावेळी धोनीच्या कर्णधारपदाला सेहवागने १० पैकी फक्त चार गुण दिले. शिवाय राजस्थाविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी धोनी प्रयत्नच करत नव्हता, अशी टीकाही सेहवागने केली आहे.

धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आल्यामुळे एकीकडे त्याच्यावर टीका होतेय. चाहते मात्र, त्याच्या या निर्णयाचं समर्थन करत असल्याचं सोशल मीडियावर पाहता आलं. जाडेजा आणि सॅम कुरैनला बढती दिल्यामुळे चाहते धोनीचं कौतुक करत आहेत. सेहवागने Cricbuzz शी बोसताना म्हटले की, ”धोनीने अखेरच्या षटकांत तीन षटकार लगावले. त्यामुळे असं वाटले की चेन्नई विजयाच्या जवळ पोहचला. पण सत्य हे नाही. आधीच्या काही षटकांत धोनीने खेळलेल्या निर्धाव चेंडूंमुळे सामना जिंकण्यासाठी धोनी प्रयत्नच करत नव्हता, असं वाटत होते. अशा परिस्थितीत धोनीने फलंदाजीत स्वतला प्रमोट करायला हवं होतं.”

सेहवाग म्हणाला की, ”धोनीने फंलदाजीत वरती यायला हवं. जडेजा आणि सॅम कुरैन यांनी राज्यस्थान विरोधच्या सामन्यात धावगती मंदावली नसती तर अखेरच्या षटकांत विजयासाठी २० ते २२ धावांची अवश्यकता लागली असती. अखेरच्या षटकात तीन षटकार लगावत लोकांकडून वाह वा मिळवली असेल मात्र, चेन्नईने हा सामना गमावला हे सत्य आहे.”

धोनीच्या कर्णधारपदामधील आणखी एका निर्णयावर सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. सेहवाग म्हणाला की, ‘ज्यावेळी संजू सॅमसन फलंदाजी करता होता तेव्हा दोन्ही फिरकी गोलंदाजांना षटकं का दिली. चावलाने चार षटकांत ५५ तर जाडेजाने ४ षटकांत ४० धावा दिल्या. सॅमसनने या दोघांची तुफान धुलाई केली.’

सेहवाग म्हणाला की, राज्यस्थान विरोधातील सामन्यात धोनने दोन मोठ्या चुका केल्या आहेत. पहिली म्हणजे, संजू सॅमसनसमोर फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी दिली. आणि दुसरी म्हणजे स्वत सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्यामुळे धोनीच्या कर्णधारपदाला १० पैकी चार क्रमांक देईन.

गंभीरकडून टीका

महेंद्रसिंह धोनीने संघ अडचणीत असताना  सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणे हे एका कर्णधाराला साजेसे नाही. धोनीने आघाडीवर राहून नेतृत्व करायला हवे होते,, अशी टीका माजी फलंदाज गौतम गंभीरने केली.