कर्णधार रोहित शर्माचं अर्धशतक आणि मधल्या फळीत इशान किशनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं आहे. विजयासाठी मिळालेलं १५७ धावांचं आव्हान मुंबईने ५ गडी राखून पूर्ण केलं. सलग दुसऱ्या विजयानंतर सर्वच स्तरातून मुंबई इंडियन्सवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माचं हे पाचवं तर एकंदरीत सहावं विजेतेपद ठरलं. अनेक आजी-माजी खेळाडूंनीही मुंबईच्या खेळीचं कौतुक केलं.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही मुंबई इंडियन्सचं कौतुक करताना सध्याच्या घडीचा सर्वोत्तम टी-२० संघ म्हणत मुंबईला शाबासकी दिली आहे.

इतकच नव्हे तर सध्या संधी मिळाली तर मुंबई इंडियन्सचा संघ टी-२० विश्वचषकही जिंकू शकतो असंही वॉन म्हणाला.

रोहित शर्माने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. ५१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह त्याने ६८ धावा केल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला खरा…पण त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.