मुंबई आणि बंगळुरु यांच्यात दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये अखेरीस बंगळुरुने बाजी मारली. मुंबईने विजयासाठी दिलेलं ८ धावांचं आव्हान आरसीबीने सहज पूर्ण केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीने अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या विजयाबरोबरच विराट कोहलीच्या बंगळुरु संघाने गुणतालिकेमध्ये सातव्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर मुंबईची एका क्रमांकाने घसरण झाली असून मुंबईचा संघ पाचव्या स्थानी गेला आहे. पहिल्या दहा सामन्यांनंतर गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी दोन विजयांसहीत चार गुणांसोबत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. नेट रनरेटच्या हिशोबाने दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सपेक्षा सरस असल्याने दोघांकडेही चार गुण असले तरी दिल्ली अव्वल स्थानी आहे. तर तिसऱ्या स्थानी तीन सामने खेळलेला आरसीबीचा संघ आहे. दिल्ली आणि राजस्थानने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर आरसीबी आपल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजयी झाल्याने ते चार गुणांसहीत तिसऱ्यास्थानी आहेत. पाचव्या स्थानी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अनपेक्षितरित्या पराभव झालेला पंजाबचा संघ आहे. तर आरसीबीकडून सोमवारी पराभव झाल्याने मुंबईचा संघ गुणतालिकेमध्ये दोन परभवांसहीत पाचव्या स्थानी गेला आहे. मुंबईच्या खालोखाल कोलकाता, चेन्नई आणि हैदराबादचा संघ आहे. मालिकेतील आपले पहिले दोन्ही सामने गमावल्याने हैदराबादला अजून गुणतालिकेमध्ये भोपळाही फोडता न आल्याने ते तळाशी आहेत. आयपीएलच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.