गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करुन तेराव्या हंगामाची दणक्यात सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जला दुसऱ्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. शारजाच्या मैदानावर २१७ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ २०० धावांपर्यंतच मजल मारु शकला. फाफ डु-प्लेसिसचा अपवाद वगळता चेन्नईचा एकही फलंदाज या सामन्यात आश्वासक खेळी करु शकला नाही. मधल्या षटकांत जिथे चेन्नईला फटकेबाजीची गरज होती तिकडेही धोनीने स्वतःला मागे ठेवून इतरांना संधी दिली. धोनी फलंदाजीसाठी लवकर मैदानात का आला नाही यावरुन सोशल मीडियावर लगेच चर्चा सुरु झाली.

सामना संपल्यानंतर धोनीने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आपण सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आलो याचं कारण सांगितलं. “गेल्या काही महिन्यांपासून मी फलंदाजीचा फारसा सराव केलेला नाही. दुबईत आल्यानंतर १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधीची फारशी काही मदत झाली नाही. याचसोबत आम्ही काही नवीन गोष्टी ट्राय करत आहोत. जर या गोष्टी जुळून आल्या नाहीत तर आम्ही पुन्हा आमच्या जुन्या रणनितीकडे जाऊ शकतो.”

अवश्य वाचा – IPL 2020 : राजस्थानच्या वादळात CSK चं विमान जमिनीवर

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत धोनीने सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला परंतू तोपर्यंत पाणी पुलाखालून गेलं होतं. २० षटकांत चेन्नईचा संघ २०० धावांपर्यंत पोहचून शकला आणि राजस्थानने १६ धावांनी सामन्यात विजय संपादन केला. सलामीच्या सामन्यातही धोनी फलंदाजीसाठी मैदानात येईल अशी सर्वांना आशा होती, परंतू धोनीने उशीरा फलंदाजीला येणं पसंत केलं होतं.