आयपीएलच्या तेराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं आव्हान संपुष्टात आलं. रैना-हरभजनने घेतलेली माघार, स्पर्धेआधी दोन खेळाडूंना झालेली करोनाची लागण, खेळाडूंच्या दुखापती, चुकीची संघनिवड यासारख्या समस्यांमधून चेन्नईचा संघ सावरुच शकला नाही. मात्र स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंना सूर गवसायला सुरुवात झाली आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीतून चेन्नई बाद झालं असलं तरीही आपल्या उर्वरित सामन्यांमध्ये चांगला खेळ करत चेन्नई इतर संघांचं गणित बिघडवू शकते. दुबईच्या मैदानावर चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सलग दुसऱ्या सामन्यातक अर्धशतकी खेळी करत पुन्हा एकदा स्वतःची निवड सिद्ध केली आहे.

१७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईने चांगली सुरुवात केली. वॉटसन आणि गायकवाडने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. परंतू या भागीदारीत ऋतुराजचं योगदान अधिक होतं. फॉर्मात नसलेला शेन वॉटसन वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतरही मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेत आपलं अर्धशतक झळकावलं. आयपीएलच्या तेराव्या हंगामात लागोपाठ दोन सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋतुराजचं नाव आलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामन्यातही ऋतुराजने अर्धशतकाची नोंद केली होती. या सामन्यात धोनीसोबत केलेल्या महत्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर चेन्नईने सामना जिंकला होता. दरम्यान त्याआधी नितीश राणाच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर कोलकात्याने १७२ धावांपर्यंत मजल मारली. नितीशने ६१ चेंडूत ८७ धावा केल्या.