आपल्या पहिल्या विजेतेपदाचं स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या RCB च्या संघाचं पुन्हा एकदा स्वप्न भंगलं आहे. अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६ गडी राखून मात केली. या पराभवासह RCB चं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं हैदराबादकडून विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केलं. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. त्याला होल्डरने २४ धावा करत मोलाची साथ दिली.

अवश्य वाचा – BLOG : RCB आणि विराटला नव्याने विचार करण्याची गरज !

भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी RCB चा संघ आणि विराट कोहलीच्या कामगिरीचं विश्लेषण केलं आहे. “विराट कोहलीने ज्यापद्धतीने स्वतःचा स्टँडर्ट सेट केला आहे त्यापद्धतीने विराटचा खेळ झाला नाही. RCB च्या गेल्या काही सामन्यांतील खराब कामगिरीचं हे महत्वाचं कारण आहे. कारण ज्या सामन्यांमध्ये विराट आणि एबी डिव्हीलियर्स चांगला खेळ करतात त्या सामन्यात RCB चा संघ चांगली कामगिरी करतो.” सामना संपल्यानंतर Star Sports वाहिनीवर बोलत असताना गावसकर यांनी आपलं मत मांडलं.

याव्यतिरीक्त RCB ला आपल्या गोलंदाजीतही बरीच सुधारणा करण्याची गरज असल्याचं गावसकर म्हणाले. शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर यासारख्या खेळाडूंचे संघातले रोल नक्की झाले पाहिजेत असंही गावसकर म्हणाले. हैदराबादविरुद्ध सामन्यातही RCB च्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकापर्यंत सामन्यात चांगली रंगत निर्माण केली, परंतू होल्डर-विल्यमसन जोडीला माघारी धाडण्यात ते अपयशी ठरले.