IPL 2020 Playoff : युएईत सुरु असलेली आयपीएल १३ ही स्पर्धा आता उत्तरार्धाकडे झुकत चालली आहे. सर्व संघ प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठछी धडपड करत आहेत. बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं आरसीबीचा पाच विकेटनं पराभव केला. या विजयासह मुंबईच्या नावावर १६ गुण झाले आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल असून प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्क झालं आहे. पण आयपीएलकडून अद्याप यावर शिक्कामोर्तब झालं नाही. त्याचं कारणही तसेच आहे.

मुंबई इंडियन्स संघानं १२ सामन्यात ८ विजय मिळवत १६ गुणांची कमाई केली आहे. १६ गुणांसह मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण उर्वरीत सामने आणि गुणतालिकेवर नजर मारल्यास ५ संघ १६ गुणांपर्यंत मजल मारु शकतात हे स्पष्ट दिसतेय. त्यामुळे कोणते चार संघ क्वालिफाय होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सर्वात आधी गुणतालिकेवर एक नजर मारुयात… त्यानंतर काय आहेत समिकरणं पाहूयात

मुंबईचं स्थान जवळपास पक्कं, पण –
एखादा चमत्कारचं मुंबईला प्ले ऑफमधून बाहेर काढू शकतो. जर पुढील दोन्ही सामन्यात मुंबईचा २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी पराभव झाला आणि कोलकाता नाइट राइडर्सने उर्वरीत दोन सामने १८५ धावांच्या अंतरानं जिंकले तेव्हाच कोलकाताचा नेट रनरेट मुंबईपेक्षा वरचढ होईल. सध्या केकेआरचा नेट रन रेट (-0.479) खूप खराब आहे.

प्लेऑफच्या स्पर्धेत ५ संघ –
१६ गुणांसह मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण इतर संघाच्या सामन्यानंतरच क्वालिफाय होणाऱ्या संघाची नावे समोर येतील. मुंबईचं प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्कं समजलं जातेय. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसह पंजाब आणि कोलकाता हे संघही या स्पर्धेत आहेत. या सर्व संघाचे १२ सामने झाले आहेत. सर्वांना उर्वरीत सामने जिंकून १६ गुणांपर्यंत मजल मारता येईल. यामध्ये आरसीबी आणि दिल्ली संघाचे १४ गुण आहेत.

प्लेऑफचं समीकरण काय आहे ?
१४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या आरसीबीचे दोन सामने बाकी आहेत. त्यापैकी एक सामना दिल्ली आणि दुसरा सामना हैदराबाद संघाविरोधात आहे. जर आरसीबी दिल्लीकडून पराभूत झाली अन् हैदराबादचा पराभव केला तर संघाचे १६ गुण होतील. दुसरीकडे दिल्लीला आरसीबी आणि मुंबईविरुद्ध सामने खेळायचे आहेत. म्हणजेच आरसीबी किंवा मुंबईचा पराभव करुन प्लेऑफमध्ये प्रवेश करावा लागेल. सलग पाच सामने जिंकत १२ गुणांपर्यंत पोहचणाऱ्या पंजाबचे उर्वरीत सामने राजस्थान आणि चेन्नई यांच्याविरोधात आहेत. पंजाबने दोन्ही सामने जिंकल्यास १६ गुण होतील. तसेच कोलकातालाही चेन्नई आणि राजस्थानविरोधात उर्वरीत सामने खेळायचे आहेत. जर दोन्ही सामने कोलकाताने जिंकले तर १६ गुण होतील.

१६ गुणानंतरही प्लेऑफमधून बाहेर?
वरील समिकरणानुसार पाच संघ १६ गुणांपर्यंत मजल मारु शकतात. अशात ज्या चार संघाचा नेट रनरेट चांगला असेल ते संघ क्वालिफाय होतील. मुंबई नेट रन रेटमध्ये सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळे मुंबईचं प्लेऑफमधील स्थान पक्कं मानलं जातेय. त्यामुळे १६ गुणांपर्यंत मजल मारणाऱ्या इतर चार संघापैकी एका संघाला बाहेर जावं लागेल.