रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामन्यात सुपरओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबवर ४८ धावांनी मात करत मुंबईने या हंगामातला आपला दुसरा विजय नोंदवला आहे. विजयासाठी मिळालेल्या १९२ धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावांपर्यंत मजल मारु शकला.

या विजयाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वलस्थानावर झेप घेतली आहे. ४ सामन्यांत मुंबईचा हा दुसरा पराभव असला तरीही मुंबईने गमावलेले दोन्ही सामने हे फार कमी फरकाने होते, त्यामुळे मुंबईच्या धावगतीवर याचा फारसा परिणाम झालेला नाही. त्यातच पंजाबवर ४८ धावांनी मात केल्यामुळे मुंबईचा रनरेट +१.०९४ इतका झाला असून त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थान मिळालं आहे.

पंजाबच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच अंकुश लावण्याचं काम मुंबईच्या गोलंदाजांनी केलं. मोठे फटके खेळण्याची संधी न देता पंजाबच्या फलंदाजांवर दडपण आणण्यात मुंबईचे गोलंदाज यशस्वी ठरले. मुंबईकडून जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी २-२ तर ट्रेंट बोल्ट आणि कृणाल पांड्या यांनी १-१ बळी घेतला.