१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होते आहे. भारतात यंदा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने स्पर्धेचं आयोजन युएईत केलं आहे. करोनामुळे यंदा आयपीएलचे सामने प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार नाहीयेत. युएईतही करोनाचे रुग्ण आढळत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात सर्व क्रिकेटपटू हे सुमारे ४ ते ६ महिने घरात बसून होते. प्रेक्षकांविना आयपीएल सामन्यांना मजा येईल का असा प्रश्न काही दिवसांपूर्वी विचारला जात होता. भारतीय संघाचा माजी गोलंदाज अजित आगरकरने या प्रश्नावर आपलं उत्तर दिलं आहे.

अवश्य वाचा – …तर आंद्रे रसेल आयपीएलमध्ये द्विशतक झळकावू शकतो !

“६ महिने क्रिकेटपासून दुरावलेल्या खेळाडूंना प्रेक्षकांविना सामने खेळणं ही गोष्ट फारशी जड जाणार नाही. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये आपल्याला आणि खेळाडूंनाही थोडं विचीत्र नक्कीच वाटेल. पण सरतेशेवटी स्पर्धा सुरु होतेय हे महत्वाचं आहे. यापैकी अनेक खेळाडू आपल्या कारकिर्दीत सर्वोच्च स्थानावर आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेटपासून ६ महिने दुरावणं ही खेळाडूंसाठी मोठी गोष्ट ठरु शकते. त्यामुळे खेळाडू आयपीएलचे सामने खेळण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील.” अजित आगरकर Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

दरम्यान रविवारी संध्याकाळी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. सध्या सर्व खेळाडू युएईत सराव करत आहेत.

अवश्य वाचा – एका क्लिकवर जाणून घ्या आयपीएल २०२० चं संपूर्ण वेळापत्रक