हैदराबादच्या संघाने Playoffsच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या बंगळुरु संघावर ६ गडी राखून मात केली. या पराभवासह RCBचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं माफक आव्हान हैदराबादच्या विल्यमसन-होल्डर जोडीने संयमी फलंदाजी करत पूर्ण केलं. या पराभवानंतर मुलाखतीत बोलताना विराटने आपल्या चुकांची कबुली दिली.

नक्की काय चुकलं?

“आमच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर आम्ही हैदराबादला आव्हानात्मक वाटेल असं लक्ष्य देऊ शकलो नाही. गोलंदाजीच्या वेळी आम्ही अप्रतिम कामगिरी करत सामन्यात पूर्णपणे पुनरागमन केलं. काही ठिकाणी झालेल्या चुकांमुळे सामना हातून निसटला. पण मूळ मुद्दा हाच होता की आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही. गेल्या काही सामन्यात आमच्याकडून चांगली कामगिरी होऊ शकली नाही. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची जी बलस्थाने होती, त्याचा त्या गोलंदाजांनी पूर्णपणे वापर केला. आम्हाला त्यांच्यावर दडपण आणता आलं नाही”, अशी कबुली विराटने सामना संपल्यानंतर झालेल्या मुलाखतीत दिली.

हंगामात सकारात्मक काय घडलं?

“आमच्या फलंदाजांनी अनेकदा चांगल्या संधी दवडल्या. शेवटचे ४-५ सामने हे आमच्यासाठी खूपच विचित्र ठरले. यंदाच्या हंगामात देवदत्त पडीकल, मोहम्मद सिराज असे काही निवडक चेहरे चांगली कामगिरी करून गेले. युझवेंद्र चहल आणि डीव्हिलियर्सनेदेखील खूपच अप्रतिम कामगिरी केली. देवदत्त पडीकलचं विशेष कौतुक आहे कारण एकाच स्पर्धेत ४००हून अधिक धावा करणं ही सोपी गोष्ट नाही”, अशा शब्दात विराटने काही सकारात्मक गोष्टींबाबत भावना व्यक्त केल्या.

स्पर्धा एवढी रंगतदार होण्याचं कारण…

“हे वर्ष फारच कठीण होतं. या वर्षाने तुमच्या संघाची बलस्थानं नक्की कोणती हे दाखवून दिलं. यंदाच्या हंगामात घरचं मैदान आणि पाहुण्या संघाचं मैदान (Home and Away) अशा गोष्टी नव्हत्या. सर्व संघांसाठी मैदानांची परिस्थिती सारखीच होती. अशाच वेळी नक्की कोणता संघ किती बलवान आहे हे स्पष्ट होतं. मला वाटतं याच एका कारणामुळे यंदाचा हंगाम प्रचंड स्पर्धात्मक ठरला. येथे येऊन खेळायला मिळालं ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही करोनाकाळातही चाहत्यांसाठी काहीतरी करू शकलो याबद्दल आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो”, असेही विराटने नमूद केले.