आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपलं स्थान निश्चीत करण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६ गडी राखून मात केली. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी अर्धशतकी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. दिल्लीने बंगळुरुवर मात केली असली तरीही १७.३ षटकांच्या आत दिल्लीने हा सामना न जिंकल्यामुळे बंगळुरुलाही प्ले-ऑफमध्ये स्थान मिळालं. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने अजिंक्य रहाणेला संधी दिली नाही. मात्र यानंतरच्या सामन्यांमध्ये पृथ्वी शॉ अपयशी ठरत असल्यामुळे अजिंक्यला संधी देण्यात आली.

“सुरुवातीला मला खेळण्याची संधी मिळाली नाही तेव्हा मी निराश झालो होतो. परंतू RCB विरुद्ध सामन्यात संधी मिळाली आणि संघाच्या विजयात मी हातभार लावू शकलो याचा मला आनंद आहे. सामन्याआधी रिकी पाँटींगने मला तू तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहेस असं सांगितलं. माझ्यासाठी ही खूप चांगली संधी होती. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी संघाला आपली गरज असते त्यावेळी आपण तसा खेळ करु शकलो तर तो आनंद अधिक द्विगुणित होतो.” सामना संपल्यानंतर आयपीएलच्या संकेतस्थळासाठी दिलेल्या विशेष मुलाखतीत अजिंक्य बोलत होता.

अवश्य वाचा – …म्हणून अजिंक्य रहाणेसारखा खेळाडू संघात हवाच ! विरेंद्र सेहवागने केलं कौतुक

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन जोडीने दिल्लीकडून डावाची सुरुवात केली. परंतू पृथ्वी शॉ पुन्हा एकदा अपयशी ठरला…मोहम्मद सिराजने ९ धावांवर शॉचा त्रिफळा उडवला. यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत दिल्लीच्या डावाला आकार दिला. ४६ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने अजिंक्य रहाणेने ६० धावांची खेळी केली.