डॉ. बाबा आढाव दिवसभर दवाखाने व रात्री हमाल पंचायतच्या सभा असायच्या. त्यात समाजवादाचे बाळकडू आम्ही प्यालेलो. कामगार चळवळ हे त्यातले महत्त्वाचे अंग, त्यातही हमालांसारख्या घटकांची संघटना व तिचे पंचायत हे नाव बरंच काही बोलून जातं. याच काळात झोपडपट्टय़ांच्या संघटनेशी व त्यांच्या चळवळीशी आम्ही जोडले गेलो. हमाल पंचायत, झोपडी संघ आणि पुणे हडपसरचे दवाखाने ही सर्कस जोमाने सुरू राहिली. हमाल, झोपडपट्टीधारक, कष्टकरी, मोलकरीण, रिक्षाचालक यांसारख्या असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी डॉ. बाबा आढाव यांचा आजही लढा सुरूच आहे. या लढय़ामुळे बाबांना पूर्ण आयुष्यात संघर्ष करावा लागला. बाबांनी अल्पकाळ राजकारण तर आयुष्यभर समाजकारण केले. त्यांनी बी.एस्सी. केले. आयुर्वेदाची पदविका मिळवली आणि नाना पेठेत दवाखाना सुरू केला. त्यातूनच ते हमाल पंचायतीशी जोडले गेले. बाबा आढाव १९६२ ते १९७१ या काळात पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. एक गाव एक पानवठा, हमाल माथाडी कायदा, पथारी व्यावसायिकांसाठीचे धोरण, रिक्षा पंचायतीद्वारे रिक्षाचालकांचे प्रश्न अशा अनेक चळवळी करून बाबांनी त्या-त्या सर्वाना न्याय मिळवून दिला आहे. असंघटितांना पेन्शन मिळावी, यासाठी अनेक आंदोलने उभी केली. त्यांचा संघर्ष आजही सुरूच आहे. मी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास झालो तो दिवस होता, १ जून १९४७. माझी जन्मतारीखही शाळेच्या दाखल्यावर १ जून लागलेली. पुढे तीच कायम राहिली आणि आजही तीच आहे. त्याचे कारण वडिलांचे निधन झाले तेव्हा मी आईच्या मांडीवर ५-६ महिन्यांचा होतो, असं सांगतात. पाच भावंडांत मी सर्वात धाकटा. आईचे वय २७-२८ असावं. आम्ही सर्व जण आजोळी वाढलो. वडिलांच्या निधनानंतर आढावांच्याकडे आधार नव्हता. आमच्या बरोबर आजीच्या माहेरचे तिघे जण, आईच्या लग्नाच्या दोन बहिणी, मामा-मामी आणि आमची भावंडं अशी बरीच मंडळी होती. आईचे मामेभाऊ लक्ष्मण गायकवाड, बाजारपेठेत ते दिवाणजी होते. ते मला सेवा दलाच्या शाखेत घेऊन जात. त्या वेळी व्यापारी पेठेत महात्मा गांधींचा व खादीचा मोठा दबदबा होता. लक्ष्मण मामा खादी वापरत. त्या वेळी सेवा दलाची शाखा गंज पेठेतील जानाईच्या मळ्यात भरत असे. ती सकाळची शाखा होती. मैदानावर मोकळेपणाने खेळता येत असे. तिरंगा झेंडा, झेंडा वंदन, कवायत, वेगवेगळे खेळ तासभर भरायचे. अधून-मधून बौद्धिक असायचं. याच काळात म्हणजे १९४१ पासून मी ‘शिवाजी मराठा हायस्कूल’मध्ये शिकत होतो. बिगारी किंवा १ली ते ४थी नाना पेठेतील म्युनिसिपल शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झाले. इंग्रजी पहिलीची सुरुवात ‘शिवाजी मराठा हायस्कूल’मध्ये झाली. १९४१ ते १९४७ या काळात ‘शिवाजी मराठा हायस्कूल’मध्ये मी शिकलो. गुरुवर्य बाबुरावजी जगताप हे आम्हाला हेड मास्तर म्हणून लाभलेले. गुरुवर्य पूर्णपणे खादीधारी. १९४२ ते १९४७ स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अधून-मधून हरताळ असे. आता हरताळ शब्द ऐकू येत नाही. एक आठवण आहे. १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांचा कुठं तरी विजय झाला. रोज शिस्तीत माघार वाचायला- ऐकायला मिळत होती. त्या दिवशी विजयाच्या बातमीबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातून वाटायला पेढे आले आणि आम्ही विद्यार्थ्यांनी ते सर्व पेढे मैदानावर फेकून दिले. मैदानावर पेढय़ांचा पाऊस पडला होता. आमचे त्या काळात भाई वैद्य व सदा बोराटे नेते होते. निळू फुले, राम ताकवले इत्यादी मंडळीही आगे-मागे होती. विद्यार्थी वर्गात स्वातंत्र्य ज्योतीला सेवा दलाने प्रज्वलित केले. माझ्या डोक्यावरही शाळेत खादीची गांधी टोपी होती. सेवा दलामुळे व लक्ष्मण मामांमुळे चुनीलाल सेटिया यांच्यामुळे १९४२, १९४३ या वर्षांत झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचं बाळकडू चाखायला मिळाले. एक दिवस आठवतो. आमचे शाखा नायक चुनीलाल सेटिया आणि आमच्या मामांना शाखेवरच पोलीस अटक करून घेऊन गेले. या घटनेचा मनावर उमटलेला ठसा आजही कायम आहे. ‘चले जाव’, ‘करेंगे वा मरेंगे’ या घोषणा कुठं तरी खोलवर रुजल्या. सेवा दलात मी ओढला गेलो. शाळा आणि सेवा दलाबरोबरच मी आई व मावशींबरोबर निवडुंगे विठोबाच्या देवळात अधून-मधून कीर्तनलाही जात असे. निवडुंग्या विठ्ठलाच्या देवळात आजही तुकाराम महाराजांची पालखी येते, तर भवानी पेठेतील विठ्ठलाच्या मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आजही येते. या दोन्ही देवळात सतत कार्यक्रम चालू असतात. एक आठवण या निमित्ताने नोंदवावीशी वाटते. ह.भ.प. प्रा. सोनापंत दांडेकर ऊर्फ मामा यांची कीर्तने होत. खूप गर्दी असे. मीही आई-मावशीबरोबर जात असे. मला आठवते त्या दिवशी अधिक मास असावा. १९५०-५२ची घटना असावी. अधिक मासाचे महिनाभर कार्यक्रम असायचे. अखंड नाम सप्ताह व कीर्तन असत. अधिक मासामुळे भोजनावळीही थाटामाटात होतं. मी सेवा दलात जात असल्याने महाराष्ट्रातील दुष्काळाची भीषण परिस्थितीची जाणीव होती. मला काय वाटले कोणास ठाऊक. मी मामांना एक पत्र लिहिले. गीतेतील एका श्लोकाचा उल्लेख करून विचारणा केली. ‘महाराष्ट्रात एवढा भीषण दुष्काळ असताना इथे पक्वानांच्या भोजनाच्या पंक्ती का झडतात? आणि आपण यावर बोलत का नाही?’ असा प्रश्न विचारून पंक्ती थांबवाव्यात अशी विनंती केली. पत्र नेऊन दिले. आश्चर्याची बाब म्हणजे रात्रीच्या कीर्तनात मामांनी याचा उल्लेख केला आणि म्हणाले, ‘अशा पंक्ती घालायला मी सांगितले नाही आणि मी यात कधीही जेवत नाही.’ या घटनेने वारकरी संप्रदायात खूप खळबळ माजली. १९४५ मध्ये साने गुरुजींच्या उपोषणाच्या काळात मामांनी दांडीची सूचना- म्हणजे सगळ्यांनाच पदस्पर्श करायला मनाई करण्याची सूचना केली होती. पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर सर्वाना खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण सुरू केले होते. त्या काळात अनेकांनी अनेक सूचना केल्या होत्या. आचार्य अत्रे यांनी दांडी या सूचनेची जाहीरपणे दांडी उडवली. दांडेकर मामांना लिहिलेल्या पत्राबद्दल आईला काही माहिती नव्हती. पण तिने आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला. थोडक्यात सांगायचे म्हटले तर औपचारिक शिक्षण मी शाळेत घेतलं, परंतु खरे जीवन शिक्षण सेवा दलातूनच घेतले. त्या काळच्या इंटर परीक्षेनंतर मला आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. मेडिकलला मला जायचे होते, परंतु गुण कमी होते व खर्चही पेलवणारा नव्हता. त्यामुळे मी बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. मला स्कॉलरशिपही मिळाली. एकाच वेळी एक वर्षांचा ड्रॉप घेऊन मी बी.एस्सी. व आयुर्वेदाची पदविका मिळवली. १९५३ मध्ये घरातच दवाखाना सुरू केला. बाहेर पाटी झळकली डॉ. बा. पां. आढाव, बी.एस्सी. आयुर्वेद. ती पाटी आमचे घरमालक धोंडीराम परदेशी यांनी स्वत:च्या कारखान्यात बनवून लावली. सेवा दलात माझी चुळबुळ वाढली होती. सेवा दलाचे समाजवादी पक्षाशीच संबंध होते. १९५२च्या सार्वजनिक निवडणुकीत मतदार यादीत माझं नाव समाविष्ट होऊ शकलेलं नव्हतं. तरीही मी लाल टोपी घालून समाजवादी उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्याने केला. माझ्या अंगातील गॅर्बडाईनचा कोट पाहून एका सभेत बसलेल्या माणसाने कोटाबद्दल पृच्छा केली आणि मी तात्काळ उत्तर दिले. हा कोट सासऱ्याने दिलाय (वास्तविक माझे लग्न त्या वेळी झालेलं नव्हतं. मी प्रसंग मारून नेला.). सभा धीटपणा वाढत राहिला. १९५३ला पहिला तुरुंगवास घडला. महागाई विरोधी लढा एसएम जोशींच्या नेतृत्वाखाली सुरू झाला होता. त्यात तीन आठवडय़ांची शिक्षा झाली. तो माझा पहिला कारावास. मी सुटून आलो आणि आईने मला बजावले, एक काही तरी कर. दवाखाना तरी चालव नाही तर..! आईला वाटत होतं मी दवाखाना चालवावा आणि नावलौकिक मिळवावा. तरीही १९५५च्या गोवा मुक्ती आंदोलनात डॉक्टरांचे पथक घेऊन भाग घ्यावा लागला. प्रत्यक्ष सत्याग्रहात मी उतरलो नाही. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा झंझावात सुरू झाला. त्यात अगोदरच हडपसरला माझा दुसरा दवाखाना सुरू झाला होता. नाना पेठेतील दवाखान्यामुळे माझे हमाल पंचायतीशी नाव जुळलं. त्या मंडळींना मी रोज पाहात होतो. कारण नाना, भवानी, रविवार, गणेश या पुण्यातील बाजारपेठा. हमालांची संख्या भरपूर. ‘हमाल पंचायत’ची स्थापना झाली आणि माझ्याकडे अध्यक्षपद आले. दिवसभर दवाखाने व रात्री हमाल पंचायतची सभा. समाजवादाचे बाळकडू आम्ही प्यालेलो. कामगार चळवळ हे त्यातले महत्त्वाचे अंग, त्यातही हमालांसारख्या घटकांची संघटना व तिचे पंचायत हे नाव बरंच काही नकळत बोलून जातं. याच काळातील झोपडपट्टय़ांच्या संघटनेशी व त्यांच्या चळवळीशी आम्ही जोडले गेलो. हमाल पंचायत आणि झोपडी संघ याबरोबरच पुणे हडपसरचे दवाखाने ही सर्कस जोमाने सुरू राहिली. एक जुनी हॅण्ड गिअरची सी-झेड मोटारसायकल गाडी हाताशी आली. दवाखान्यातली गर्दी, झोपडपट्टय़ांच्या चळवळीतील ओढ, पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग. मला एक आठवण सांगावीशी वाटते. हमाल वर्ग व झोपडी संघातील मंडळी या चळवळीत हिरिरीने उतरली. हमालांची ढोल-लेझीम व झोपडपट्टीतील हलगी यांच्या तालावर ‘झालाच पाहिजे’ ही घोषणा निनादात राहिली. आचार्य अत्रे ढोल वाजवणाऱ्या आमच्या बुधाभाई सावंताची आवर्जून चौकशी करीत, तर झोपडपट्टीतील स्त्रिया मिरवणुकीतून जाताना बाजूला बघ्याची भूमिका घेतलेल्या स्त्रियांना मिरवणुकीत ओढून फुगडय़ा खेळायच्या. तो काळच मंतरलेला होता. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मंगल कलश दिल्लीहून आला की जन चळवळीतून तो विराजमान झाला. आमच्या मते, याचं उत्तर स्पष्ट आहे. पुन्हा थोडे मागे जावेसे वाटते. स्वातंत्र्याची पहाट आम्ही पाहिली. १४ ऑगस्ट १९४७ रोजी निघालेली ती प्रचंड मिरवणूक. स्वातंत्र्याच्या स्वागतासाठी सजलेल्या बाजारपेठा, घरा-घरावर लागलेल्या दीपमाळा आणि तो जयघोष. रात्रीच्या १२ वाजता त्या वेळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात इंग्रजांच्या युनियन जॅकच्या जागेवर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकला. आजही तो प्रसंग तसाच्या तसा डोळ्यापुढे तरळतो. स्वातंत्र्यामुळे मतदानाचा हक्क मिळाला. माय-भाषेचे राज्य निर्माण झाले. आयुष्यातल्या तिशीतला हा सगळा ताळेबंद म्हणावा लागेल. rahul.nagavkar@gmail.com chaturang@expressindia.com