एक प्रथितयश तरुण स्त्रीरोगतज्ज्ञ पोटात दुखते म्हणून अ‍ॅसिडिटीच्या गोळ्या खात होत्या. डोळ्यात पिवळेपणा दिसला म्हणून पुढचे तपास केले. काही दिवसानंतर त्यांना पुढे गेलेला स्वादुपिंडाचा कर्करोग आहे असे आढळून आले. मोठी शस्त्रक्रिया शक्य नसल्याने लवकरच त्यांचा मृत्यू झाला. स्वादुपिंडाचा कर्करोग समजून येण्यासाठीच वेळ लागतो, यासारखी अनेक उदाहरणे आहेत. खूपदा उशिरा निदान झाल्याने उपचार करता येत नाही व लवकरच रुग्ण दगावतो.

आपल्या पोटात जठराच्या मागे स्वादुपिंड हा महत्त्वाचा अवयव असतो. तो पाचक रस व इन्सुलिन निर्माण करतो. पाचक रसाने अन्नपचनास मदत होते. इन्सुलिनमुळे साखरेचे प्रमाण योग्य ठेवले जाते व इन्सुलिन कमी झाल्यास डायबेटिस होतो. स्वादुपिंडालाही कर्करोगाची बाधा होऊ  शकते. इतर कर्करोगांच्या मानाने हा कर्करोग लवकर पसरतो व रुग्ण त्या मानाने लवकर दगावतो.

Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

आज जगात सर्वसाधारणत: पाच लाख रुग्ण दरवर्षी या आजाराने मृत्यू पावतात. प्रगत उपचार पद्धती उपलब्ध असूनसुद्धा निदानानंतर फक्त पाच टक्के रुग्ण पाच वर्षांपर्यंत जगतात.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे :

प्राथमिक स्वरूपात या आजाराची फारशी लक्षणे नसतात, पण तो पुढे जातो तेव्हाच त्याची ती दिसू लागतात.

  • पोटाच्या वरच्या भागात दुखणे व दुखणे पाठीत पसरणे.
  • कावीळ होणे- या काविळीत सुरुवातीस काहीच दुखत नाही व पिवळटपणा वाढत जातो.
  • भूक न लागण
  • वजन कमी होणे
  • नैराश्य जाणवणे

स्वादुपिंडाच्या कर्करोगाची कारणे

आपल्या स्वादुपिंडाच्या पेशींमध्ये जनुकीय बदल होऊन नॉर्मल पेशींचा मृत्यू होतो. कर्करोगाच्या पेशींचा प्रादुर्भाव होऊन गाठी निर्माण होतात. बरेचदा स्वादुपिंडाचा कर्करोग हा स्वादुपिंडाच्या नलिकेपासून होतो.

स्वादुपिंडाचा कर्करोग होण्यास खालील गोष्टी प्रवृत्त होतात.

  • ‘धूम्रपान ’ अतिवजन/ लठ्ठपणा
  • स्वादुपिंड दाह असणारे रुग्ण व त्यांचे कुटुंबीय ’ कुटुंबामध्ये स्वादुपिंडाचा कर्करोग ’ साठ वर्षे व त्यापुढील वयाच्या व्यक्ती. पुरुषांना जास्त प्रमाणात. ’ श्वेतवर्णीय व्यक्तींना हा कर्करोग कमी प्रमाणात होतो ’ मधुमेह ’ कीटकनाशक आणि रसायनांचा संबंध

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

वजन कमी होते, भूक लागत नाही, पोटात दुखते व कावीळ वाढते तेव्हा डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. अशा लक्षणांची अनेक कारणे असतात. पण डॉक्टर तपासण्या करून योग्य तो सल्ला देतील.

कर्करोगाचे निदान व तपासण्या

  • अल्ट्रा साऊंड किंवा सोनोग्राफी-  स्वादुपिंडाच्या गाठी तसेच त्यामुळे झालेल्या पित्ताशयावरील परिणाम जाणून घेतला जातो.
  • सीटी स्कॅन- यातून पोटात अजून कुठे गाठ आहे व कॅन्सर किती पसरला आहे हे समजते.
  • एमआरआय- एमआरआय मशीननेही हा तपास करता येतो.
  • Endoscopy with ERCP –  – डॉक्टर एण्डोस्कोपी साठी एक पातळ रबरी नळी तोंडाद्वारे पोटात घालून लहान आतडय़ाचा तपास करतात. स्वादुपिंडाचा रस जिथे आतडय़ात येतो, तेथे गाठ असेल तर तिची बायप्सीही घेता येते. बायप्सी म्हणजे एक छोटासा तुकडा काढून गाठींचे निदान करणे.

कावीळ जास्त प्रमाणात असेल तर या एण्डोस्कोपीतून एक नळी पित्तनलिकेत घालून कावीळ कमी करता येते. कावीळ कमी झाल्याने शस्त्रक्रियेचा धोका कमी होतो.

एण्डोस्कोपी शक्य नसल्यास- यकृतामध्ये सुई घालून एक नळी टाकली जाते (PTC) व त्यामधून पित्त काढले जाते. यामुळेही कावीळ कमी होते.

याबरोबरच लॅप्रोस्कोपी (पोटाचा दुर्बिणीद्वारे तपास) छातीचा एक्सरे, PET Scan,  हाडांचा स्कॅन (Bone Scan) तसेच इतर रक्तांच्या तपासण्या करून कर्करोग किती पसरला आहे हे कळते.

सर्व तपासण्या झाल्यावर स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान केले जाते. त्याचे तीन वर्ग होतात.

१.  काढून टाकण्याजोगा कर्करोग- कर्करोग कमी प्रमाणात असेल तर स्वादुपिंडाच्या कर्करोगग्रस्त भाग (बहुतांशी हेड) पूर्णपणे काढला जातो. त्याचबरोबर लहान आतडय़ांचा पहिला भाग पित्तनलिकाही काढावी लागते. यालाच व्हिपल्स ऑपरेशन्स (Whipples Operations) म्हणतात. हे ऑपरेशन कौशल्याने करावे लागते व यामध्ये जिवाला धोका असतो. परंतु हल्ली अनुभवाने व इतर साधनसोयींमुळे यात रुग्ण दगावण्याची शक्यता कमी झाली आहे. व्हिपल्स ऑपरेशन्स यशस्वी झाले तर रुग्ण काही वर्षे चांगला जगू शकतो.

२. आजूबाजूच्या अवयवांमध्ये पसरलेला कर्करोग. कर्करोग पसरला असेल तर शस्त्रक्रियेद्वारा किंवा एण्डोस्कोपीद्वारा पित्तनलिका व जठर हे आतडय़ास जोडून वेगळा मार्ग निर्माण करतात. त्याने कावीळ कमी होते. रुग्णास जेवता येते. परंतु अशा रुग्णांचे आयुष्य काही महिनेच असते.

३.  दूरच्या अवयवांमध्ये पसरलेला कर्करोग. -हल्ली नवीन औषधे उपलब्ध झाल्याने काही प्रमाणात हा कर्करोग आटोक्यात आणता येतो. परंतु ही औषधे खूप महाग आहेत.

या कर्करोगाचे परिणाम

  • कावीळ, खाज येणे, लघवीचा रंग गडद होणे.
  • पोटात व पाठीत दुखणे.
  • आतडे अडकणे, उलटय़ा होणे, शौचास न होणे.
  • वजन घटणे, मधुमेह होणे.
  • रुग्ण दगावणे
  • हा कर्करोग कसा टाळाल?
  • धूम्रपान थांबवावे
  • वजन प्रमाणात ठेवावे. हळूहळू (आठवडय़ाला अर्धा किलो) वजन कमी करावे.
  • रोज तीस मिनिटे नियमित व्यायाम करावा.
  • चांगला आहार- फळे, भाज्या व चपाती यांचा आहारामध्ये समावेश.

स्वादुपिंडाचा कर्करोग कमी जणांना होत असला तरी झाल्यावर तो उशिरा लक्षात येतो. निदान होईपर्यंत तो पसरलेला असतो. याची शस्त्रक्रिया ही गंभीर व धोक्याची असते. यामुळेच रुग्णाचे आयुष्य सीमित असते. बऱ्याचदा कावीळ झाल्यानंतर रुग्ण इतर उपाय करतात व डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात. परंतु एक-दोन आठवडय़ांत कावीळ उतरली नाही तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपास करणे आवश्यक असते.

डॉ. अविनाश सुपे – response.lokprabha@expressindia.com