‘मुंबई महानगर प्रदेश’ (एमएमआर) परिसरात अकरावीला नेमक्या कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल याचा अंदाज विद्यार्थ्यांना यावा, यासाठी यंदा प्रथमच सर्व विद्यार्थ्यांची ‘सर्वसाधारण गुणवत्ता यादी’ तयार करण्यात येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी जागांसाठी पसंती क्रमांक भरल्यानंतर ही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याने ती विद्यार्थ्यांसाठी तरी बिनकामाची असणार आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार महाविद्यालयांचे पसंती क्रमांक भरण्याची संधी मिळणार नसेल तर हा खटाटोप करायचा कशाला, असा प्रश्न आहे.अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हा बदल करण्यात आल्याचे मुंबईच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत सांगण्यात येत आहे. मात्र, महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम देण्यापूर्वी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे आवश्यक आहे. कारण, तेव्हाच त्यांना आपण नेमक्या कुठल्या स्थानावर आहोत आणि आपल्याला नेमक्या कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल याचा अंदाज येऊ शकेल. परंतु, अकरावी ऑनलाइनसाठी १६ जून ही पसंती क्रमांक भरण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर २० जून रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर थेट २२ जूनला जागांचे वाटप जाहीर केले जाणार आहे. मग ‘सर्वसाधारण गुणवत्ता यादी’चा उपयोग काय, असा प्रश्न उद्भवतो.सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे काय?सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची त्यांच्या गुणांनुसार ‘गुणवत्ता यादी’ तयार करणे. खुल्या, मागासवर्गीय, अपंग अशा विविध प्रवर्गानुसार स्वतंत्र गुणवत्ता याद्या तयार केल्या जातात. यामुळे, विद्यार्थ्यांना आपले नेमके स्थान कुठे आहे हे कळते. तसेच, आपल्याला कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल याचा सर्वसाधारण अंदाज बांधता येतो. त्यानुसार मग ते गेल्या वर्षीच्या कटऑफचा अंदाज घेऊन महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरतात. अभियांत्रिकी, वैद्यकीयसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता राबविल्या जाणाऱ्या ‘केंद्रीय प्रवेश प्रक्रिये’त सर्वसाधारण गुणवत्ता यादी हे एक महत्त्वाचे सूत्र असते. पण, अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ही कॅप पद्धतीची नाही. त्यामुळे खरे तर गुणवत्ता यादी तयार करण्याचीही गरज नाही.एमकेसीएलच्या सल्ल्यावरून!याबाबत या प्रवेश प्रक्रियेचे आयोजक शिक्षण उपसंचालक भीमराव फडतरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरल्यानंतरच सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. ‘विद्यार्थ्यांना आपल्याला कुठे प्रवेश मिळू शकेल याचा साधारण अंदाज यावा यासाठी या गुणवत्ता यादीचा उपयोग होणार आहे,’ असे त्यांनी ही यादी तयार करण्यामागचा हेतू स्पष्ट करताना सांगितले. मात्र, महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरल्यानंतर त्याचा उपयोग काय, असे विचारले असता त्यांनी ही प्रक्रियेची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (एमकेसीएल) दिलेल्या सल्ल्यावरून ही प्रवेश प्रक्रिया राबवीत असल्याचे सांगितले.